आमदार प्रवीण आर्लेकर यांचे आवाहन :तळर्ण माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची सोय
पेडणे : पेडणे मतदारसंघातील प्रत्येक सरकारी प्राथमिक मराठी शाळेमध्ये संस्कारमय शिक्षण आणि पुस्तकी ज्ञानापलीकडील ज्ञान देण्याचे कार्य अखंडित सुरू आहे. अशा सरकारी शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद पडू देणार नाही. त्यासाठी पालकांनी आपल्या पाल्यांना परिसरातील सरकारी प्राथमिक शाळेमध्ये पाठवून शाळा वाचवण्याचे प्रयत्न करावेत, असे आवाहन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी केले. तळर्ण येथील सरकारी माध्यमिक शाळेच्या विद्यार्थ्यांना ये-जा करण्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या वाहनाचे उद्घाटन आणि शाळेमध्ये प्रथम प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभात आमदार आर्लेकर बोलत होते. यावेळी उपसरपंच सिद्धी राऊळ, शाळा पालक शिक्षक संघाचे अध्यक्ष नागेश शेठ, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा निवेदिता राऊळ, पंचायत सदस्य आरती राऊळ, शैलेश नाईक, जय गणेश स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष पांडुरंग नाईक, देव रवळनाथ स्पोर्ट क्लबचे अध्यक्ष नारायण राऊळ, अंगणवाडी शिक्षिका विद्या नाईक व्यासपीठावर होत्या. विद्यार्थी हा देशाचा भावी नागरिक आहे. विद्यार्थ्यावर बालपणी चांगले संस्कार झाले तर ते समाजाला योग्य पद्धतीने दिशा देऊ शकतात. तळर्ण शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी वाहनाची व्यवस्था केली आहे. शाळेची आणखी डागडूजी करण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे, असे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले.
पेडणे तालुक्यातील अनेक सरकारी प्राथमिक शाळा विद्यार्थ्यांच्या पटसंख्ये अभावी बंद पडत आहेत. शाळेची पटसंख्या वाढवण्यासाठी पालकांनी पुढाकार घेतला तर बंद पडलेल्या शाळा देखील सुरू होऊ शकतात. त्याच नजरेतून तळर्ण भागातील पालकांनी तब्बल 40 विद्यार्थी सरकारी शाळेत घालून बंद पडत असलेली शाळा वाचवण्याचे प्रयत्न केले असल्याचे आमदार आर्लेकर म्हणाले. तळर्ण गावातील सरकारी प्राथमिक शाळेत आजूबाजूच्या परिसरातील अनेक विद्यार्थी येण्यासाठी इच्छुक होते. परंतु त्यांना या शाळेपर्यंत येण्यासाठी वाहनाची सोय नसल्यामुळे काही पालकांनी आपली समस्या आपल्याकडे मांडली. पालकांच्या समस्येची दखल घेऊन विद्यार्थ्यांना या शाळेमध्ये ये-जा करण्यासाठी वाहनांची सोय करून दिली असल्याचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ने आण करण्यासाठी आमदार आर्लेकर यांनी वाहनाची सोय करून दिल्याबद्दल तळर्ण माध्यमिक शाळेच्या पालक शिक्षकांनी समाधान व्यक्त करून त्यांचे आभार मानले. यावेळी आमदार आर्लेकर यांनी सर्व विद्यार्थ्यांना चॉकलेट्स वाटले. पेडणेतील ज्या शाळांमध्ये 40 पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेतात त्या शाळांमध्ये अतिरिक्त दोन शिक्षकांची नियुक्ती सरकारने केली त्यांचेंही गुलाब पुष्प देऊन आमदार आर्लेकर यांनी स्वागत केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिक्षिका विंदा हरमालकर, विधी परब, ऊक्मिणी नाईक व पालकांनी योगदान दिले. विद्यार्थिनी धनश्री नाईक हिने स्वागत गीत सादर केले. मुख्याध्यापक विशेष आसोलकर यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.