प्रज्ञा मणेरीकर /पणजी
दरवर्षी 15 जून हा ज्येष्ठ नागरिक छळ जागरूकता दिन म्हणून जागतिक पातळीवर साजरा केला जातो. त्यानिमित्त हेल्पएज इंडियातर्फे वडीलधाऱयांना समाजात तसेच कुटुंबात कोणत्या समस्यांना अत्याचारांना सामोरे जावे लागते याबाबत सर्वेक्षण करून त्यावर तोडगा काढण्यात यावा यासाठी पावले उचलत आहेत. यंदाही ‘ब्रिज द गॅप’ ज्येष्ठ नागरिकांच्या गरजा समजूया’ या विषयावर आधारित एक सर्वेक्षणात्मक अहवाल हेल्पएज इंडियातर्फे प्रकाशित करण्यात आला.
सुमारे देशातील 22 शहरात हेल्पऐज इंडियातर्फे सर्वेक्षण करण्यात आले असून यातून देशात 40 टक्के ज्येष्ठ नागरिक सेवानिवृत्तीची मर्यादा मोडीत घालून शक्य होईल तितक्या वेळेसाठी नोकरी करू इच्छितात. तर गोव्यात 20.5 टक्के लोकांनी वृद्धापकाळात काम करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचे हेल्पएज इंडियाच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे.
भारतीय कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांवरील अत्याचार एक संवेदनशील विषय
ज्येष्ठ नागरिकांवर होणारा अत्याचार हा भारतीय कुटुंबामध्ये एक संवेदनशील विषय असून हा अहवाल समाजात अजूनही ज्येष्ठ नागरिकांसोबत गैरवर्तणूक व अत्याचाराच्या घटना घडत असल्याचे स्पष्ट करतो. देशात सुमारे 47 टक्के ज्येष्ठ नागरिक हे कुटुंबाच्या उत्पन्नावर अवलंबून असून 34 टक्के हे पेन्शन किंवा कॅश ट्रान्स्फर्ससारख्या सुविधांवर अवलंबून आहेत. 60 टक्के ज्येष्ठ आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित असून 76टक्के त्यांच्या मुलांवर अवलंबून आहेत तर 36 टक्के हे पेन्शनवर अवलंबून आहेत. सर्व्हेक्षणादरम्यान 36 टक्के ज्येष्ठांनी अजूनही काम करण्यास इच्छुक असल्याची इच्छा व्यक्त केली असून त्यातील 40 टक्के ज्येष्ठ नागरिक शक्य असेल तोपर्यंत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
अजूनही 68 टक्के वृद्ध आर्थिकदृष्टय़ा आपल्या मुलांवर अवलंबून
गोव्यात 60-69 या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची टक्केवारी 84 टक्के आहे तर 70-79 वयोगटातील 14 टक्के आणि 80-89 वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांची 2 टक्के आहेत. गोव्यातील सुमारे 68टक्के ज्येष्ठ नागरिक हे अजूनही आपल्या आर्थिक गरजांसाठी मुलांवर किंवा इतर नातेवाईकांवर अवलंबून आहेत. तसेच 33 टक्के हे पेन्शन व इतर सुविधांवर अवलंबून आहेत. विशेष म्हणजे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, हैदराबाद, यासारख्या मोठय़ा शहरांपेक्षा गोव्यात 55.5 टक्के ज्येष्ठ नागरिक आर्थिकरित्या समाधानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. याची राष्ट्रीय स्तरावर टक्केवारी 47.9 टक्के आहे. या अहवालानुसार असे दिसून आले आहे राष्ट्रीय स्तरावर 59.5टक्के ज्येष्ठ नागरिक हे आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आहेत. परंतु देशातील इतर मोठय़ा शहरांपेक्षा गोव्यात सुमारे 58.5 ज्येष्ठ नागरिक आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित आहेत.
राज्यात 20.5 टक्के ज्येष्ठांनी नोकरी करायची दाखविली तयारी
आर्थिकदृष्टय़ा सुरक्षित व्हावे यासाठी अजूनही राष्ट्रीय स्तरावर 27.5 टक्के ज्येष्ठ नागरिक नोकरी करतात तर गोव्यात सुमारे 17.5 टक्के नोकरी करतात. यातीलच गोव्यात 4.5 टक्के पूर्णवेळ नोकरी करतात तर 13 टक्के अर्धवेळ काम करतात. वृद्धापकाळात कुणावर अवलंबून राहण्याची पाळी येऊ नये यासाठी 40 टक्के लोकांनी शक्य होईल तोपर्यंत काम करण्याची इच्छा व्यक्त केली असून गोव्यात 20.5 टक्के ज्येष्ठ नागरिकांनी इच्छा व्यक्त केली आहे.
गोव्यात 8.5 टक्के वृद्धांवर होतात अत्याचार
वृद्धापकाळ म्हटला की अनेक आजार व दुखणी आलीच. यात एक चिंतेची बाब म्हणजे गोव्यात हायपरटेन्शनचे 32 टक्के ज्येष्ठ नागरिक बळी पडत आहेत. तर वृद्धत्त्वामध्ये मधुमेहींची टक्केवारी कमी नसून 36टक्के आहे. इतर बाबतीत गोव्यात ज्येष्ठ नागरिक सुरक्षित असले तरी 46 टक्के लोकांनी समाजात वृद्धांवर अत्याचार होत असल्याचे कबूल केले आहे. गोव्यात वृद्धांवर होणाऱया अत्याचाराची टक्केवारी 8.5 टक्के आहे. हे अत्याचार नातेवाईक, सूनेकडून व मुलाकडून जास्त प्रमाणात होतात. आजही गोमंतकीय कुटुंबात ज्येष्ठ नागरिकांना अनादरचा सामना करावा लागतो ज्याची टक्केवारी 88.2 टक्के आहे. तसेच 58.5 टक्के ज्येष्ठ नागरिक हे नातेवाईकाकडून शोषित होत आहेत तर 35.3टक्के ज्येष्ठ नागरिक सूनेच्या छळाला बळी पडत आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे 52.9 टक्के ज्येष्ठ नागरिकांची आर्थिकरित्या शोषण केले जाते. परंतु या अत्याचाराबाबत तक्रार नोंदविण्याविषयी 59 टक्के लोक अनभिज्ञ आहेत.
कुटुंबासोबत राहूनही वृद्धांना सहन करावा लागतो एकटेपणा
आजच्या धकाधकीच्या युगात कुटुंबाला वेळ देणे हा मोठा प्रश्न प्रत्येकाला पडतो. त्यात आपल्या आईवडिलांना वेळ देण्यासाठी कसरत करावी लागते. याशिवाय आपल्या नातवंडांना भेटण्यासाठी आजी आजोबांना वाट पहावी लागते. गोव्यात सुमारे 68 टक्के लोकांना अजूनही आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी वाट पहावी लागते. आपले कुटुंब आपल्यासोबत पुरेसा वेळ घालवावा यासाठी ज्येष्ठ नागरिक वर्षानुवर्ष वाट पाहत आहेत. त्यामुळे कुटुंबासोबत राहूनही वृद्धांना एकटेपणा जाणवत आहे. याचबरोबर फोनचा वापर फक्त कॉलिंग करण्यापुरता ज्येष्ठ नागरिकांमार्फत केला जातो. स्मार्टफोन हाताळण्यासाठी कसरत करावी लागते.
गोव्यात 21 टक्के ज्येष्ठ नागरिक वापरतात स्मार्टफोन
देशात 28.8टक्के लोक स्मार्टफोनचा वापर करतात. गोव्यात स्मार्टफोन पेक्षा साधा फोनचा वापर करणे जास्त पसंती दाखवितात. जो फक्त कॉलिंग करण्यासाठी वापरण्यात येतो. गोव्यात 21 टक्के ज्येष्ठ नागरिक हे स्मार्टफोनचा वापर करतात आणि 78 टक्के साध्या फोनचा वापर करतात. ज्येष्ठ नागरिकांना स्मार्टफोनद्वारे सोशल मीडीया, बँकेच्या सुविधा वापरण्याविषयी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. त्यासाठी प्रशिक्षक नेमण्याचीही गरज असल्याची मागणी केली जात आहे. जर या गरजा पूर्ण झाल्या तर ज्येष्ठ नागरिक सन्मानाने आपले जीवन व्यतित करू शकतात. त्यांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी, सुधारणेसाठी समान आणि पुरेशा संधी उपलब्ध करणे ही काळाची गरज आहे.
गोव्यात बदनामीच्या भीतीपोटी दाबली जातात अत्याचारप्रकरणे
ज्येष्ठ नागरिकांवर अत्याचार होत आहेत. परंतु बदनामीच्या भीतीपोटी या अत्याचारांना वाचा फुटत नाही. अत्याचाराची प्रकरणे दाबली जातात. मुलांनी आईवडिलांना एका सावलीप्रमाणे मानले पाहिजे. फक्त प्रॉपर्टीसाठी त्यांचा वापर करू नये. कायदेशीर सल्लागाराची नियुक्ती केली तरी त्याच्याकडून ज्येष्ठ नागरिकांना अवहेलना सहन करावी लागते. ज्येष्ठ नागरिकांना आपुलकी हवी आहे. गोव्यात अशी कितीतरी प्रकरणे आहेत जी दाबली जातात. अशा प्रकरणांना वाचा फुटण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग महत्त्वाचा आहे. सरकारने लवकरात लवकर आयोगाला मंजूरी द्यावी.
– राजन घाटे, ज्येष्ठ नागरिक संरक्षक व सामाजिक कार्यकर्ता