वृत्तसंस्था/ सिंगापूर
येथे झालेल्या आशिया चषक स्टेज 3 तिरंदाजी स्पर्धेत भारतीय तिरंदाज अंतिम लढतीत कोरिया व चिनी खेळाडूंसमोर दडपणाला बळी पडल्यामुळे सर्व सहाही प्रकारात त्यांना रौप्यपदकांवर समाधान मानावे लागले. पदकतक्त्यात भारताला पाचवे स्थान मिळाले.
भारताला एकही सुवर्ण मिळाले नसले तरी एकूण सात पदके मिळाली. त्यात 6 रौप्य व एका कांस्यपदकाचा समावेश आहे. तिरंदाजीतील पॉवरहाऊस मानल्या जाणाऱ्या कोरियाने 4 सुवर्ण, 1 रौप्य व 2 कांस्यपदके मिळवित अग्रस्थान पटकावले. चीनने दुसरे स्थान मिळविताना 4 सुवर्ण, 3 कांस्यपदके मिळविली.
महिलांच्या कंपाऊंड सांघिक अंतिम लढतीत भारताला कोरियाकडून 232-234 अशा केवळ दोन गुणांनी पराभव स्वीकारावा लागला. पुरुष कंपाऊंड संघानेही त्यांचाच कित्ता गिरवित कोरियाकडून 235-238 असा पराभव स्वीकारला. महिला सांघिक रिकर्व्हमध्ये कोरियाने भारताला 5-3 तर पुरुष सांघिक रिकर्व्हमध्ये चीनने भारताला 5-1 असे हरविले.