महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष : सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने अनेक अडचणी
प्रतिनिधी / बेळगाव
चिदंबरनगर परिसरातील रस्त्यांवर पेव्हर्स घालून विकास करण्यात आला आहे. मात्र अनगोळ आणि झटपटनगर परिसरातील समस्यांकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. या परिसरातील गटारींची स्वच्छता केली जात नाही. सांडपाण्याचा निचरा व्यवस्थित होत नसल्याने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे.
सध्या विविध रोगराईचा प्रसार वाढला असून विशेषतः अनगोळ परिसरात डेंग्यू सदृश रुग्णांची संख्या वाढली आहे. अशातच ठिकठिकाणी गटारी तुंबल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. काही ठिकाणी पावसाचे पाणी साचून रहात आहे. चिदंबरनगर, अनगोळ परिसरातील गटारी स्वच्छ करण्यात आल्या नाहीत. कचऱयाने भरल्या असल्याने दुर्गंधी पसरत आहे. झटपटनगरपासून गटार वळविण्यात आली आहे. काही ठिकाणी गटारीवर फरशा घालण्यात आल्याने कचरा काढण्यास अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे महापालिकेच्या कर्मचाऱयांनी गटार स्वच्छ करण्याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे. पण याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसत आहे. येथील गटारींची पाहणी करून स्वच्छता करावी व समस्यांचे निवारण करावे, अशी मागणी होत आहे.
चिदंबरनगरच्या परिसरातील रस्त्यावर पेव्हर्स घालण्यात आले आहेत. अनगोळ हद्दीतील रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत. सध्या पेव्हर्सचे रस्ते सुसज्ज असल्याने वाहनधारक सुसाट वेगाने येत आहेत.
गतिरोधक बसविण्याची मागणी
परिणामी डांबरी रस्त्यावर अपघात होत आहेत. त्यामुळे याठिकाणी गतिरोधक बसविण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. पण याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष झाले आहे. याठिकाणी तातडीने गतिरोधक घालण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.