व्याख्यानमालेत डॉ. यशवंत पाटणे यांनी मांडले विचार
बेळगाव : संकल्प, साधना, सेवा, त्याग, व्यवहार आणि भावना यामध्ये मोठेपण असते. यातूनच मी पण गळाले की देवपण निर्माण होते. जीवनाच्या तत्त्वज्ञानाचा केंद्रबिंदू माणूस आहे. अशा माणसासाठी लढतात आणि जगतात ती माणसं असतात, असे विचार सातारा येथील प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे यांनी मांडले.
सार्वजनिक वाचनालय आयोजित बॅ. नाथ पै व्याख्यानमालेत तिसरे पुष्प गुफंताना ‘जीवन त्यांना कळले हो’ या विषयावर ते बोलत होते. व्यासपीठावर वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव, उपाध्यक्ष प्रसन्न हेरेकर, सहकार्यवाह लता पाटील उपस्थित होते. प्रारंभी डॉ. विनोद गायकवाड यांनी स्वागत व परिचय करून दिला. पाहुण्यांचे स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.डॉ. यशवंत पाटणे पुढे म्हणाले, मानवी जीवनाची सार्थकता जपलेल्या मूल्यांवर अवलंबून असते. सामान्य माणूस आणि लोकशाही मूल्ये हाच बॅ. नाथ पै यांच्या विचार कार्यप्रणालीचा कार्यबिंदू होता. बॅ. नाथ ही सामाजिक न्यायासाठी झटणारी आणि विलोभनीय व्यक्ती होती. बुद्धी आणि भावनांचा संगम साधतो तो जीवनात यशस्वी होतो. ते गुण नाथांमध्ये होते. नाथ अतिशय संयमी, शांत, स्वच्छ मनाचे होते. त्यामुळे त्यांनी अनेक माणसे जोडली. याबरोबर स्वातंत्र्य लढा, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, गोवा मुक्ती आंदोलन, सीमाप्रश्न, कोकण रेल्वे यासाठी सतत लढा
दिला.
शाहू, आंबेडकर, फुले हे माणसातले देव आहेत. यांनी समाजाला ज्ञानी करून सामाजिकदृष्टय़ा पुढे आणले, चैतन्य जन्माला येण्यासाठी मनाची मशागत होणे आवश्यक आहे. शिवाय अमृताची फळे बघायची असल्यास प्रथमतः चांगली पेरणी होणे आवश्यक आहे. साधेपणा कळायचा असल्यास नाथांचे जीवनचरित्र वाचा, असा सल्ला देखील त्यांनी दिला. यावेळी रसिक श्रोते उपस्थित होते.