मुंबई : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडांनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. तर निष्ठावंत एकनाथ शिंदे यांच्या या कृत्यामुळे ठाकरे कुटुंबियांना देखील धक्का बसला आहे. आता कोणत्याही परिस्थितीत एकनाथ शिंदे याना शिवसेनेत थारा नाही, अशी भूमिका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला असला तरी, बंडखोर गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांच्या विधानामुळे एक नवा ट्विस्ट समोर आला आहे. आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करण्यास तयार आहे. असे केसरकर यांनी म्हंटले आहे. पण त्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत युती करण्याचा निर्णय घ्यावा, अशी अट देखील शिंदे गटाची आहे.
शिवसेनेतील अंतर्गत बंडाळीमुळे राज्यातील महाविकास आघाडी सरकार संकटात सापडलं असून हे सरकार अल्पमतात आल्याचाही दावा केला जात आहे. रोज नवीन घडामोडी घडत असून राज्याच्या राजकारणात कोणत्याही क्षणी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. असे असताना दीपक केसरकर यांनी एक विधानकरून या प्रकरणाला नवीन वळण दिले आहे.
‘उद्धव ठाकरे यांनी त्यांचा जुना मित्रपक्ष असलेल्या भाजपसोबत चर्चा केली पाहिजे. ते कुठे दुखावले गेले असतील तर त्याची कारणे जाणून घेतली पाहिजेत आणि भाजपनेही त्याचा विचार केला पाहिजे. भाजप आणि शिवसेना हे अनेक वर्षांचे मित्र आहेत. त्यांनी एकत्र कसं यावं, हे सांगण्याएवढा मी मोठा नाही. भाजप आणि शिवसेनेनं चर्चा करावी. या चर्चेतून काही सकारात्मक निघालं आणि उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना बोलावलं तर तेही उद्धव ठाकरे यांना भेटायला जातील. मुख्यमंत्र्यांना दुखवावं असं शिंदे यांच्या मनात नाही. फक्त शिवसेनेनं कोणाशी आघाडी आणि युती करावी, एवढ्यापुरता हा प्रश्न मर्यादित आहे,’ अशी माहिती दीपक केसरकर यांनी दिली आहे.