पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज 28 मे रोजी नवीन संसद भवनाचे उद्घाटन समारंभावर कॉंग्रेससह देशातील 20 पक्षांनी बहिष्कार टाकला आहे. या वास्तूचे उद्धाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याऐवजी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांनी करावं असा आग्रह विरोधकांनी केला आहे. विरोधकांच्या या कृतीचे समर्थन करुन हा योग्य असल्याचे सांगताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरु यांच्या संकल्पनेतील आधुनिक भारताला काही वर्षे पाठीमागे घेऊन जाण्याची भीती व्यक्त करून आपली बांधिलकी जून्या वास्तुशी असल्याचेही म्हटले आहे.
हेही वाचा >>> विरोधकांनी घेतलेला बहिष्काराचा निर्णय योग्यच; संसदभवनाच्या उद्धाटन कार्यक्रमावर शरद पवारांची प्रतिक्रिया
पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना शरद पवार म्हणाले कि, “आधुनिक भारताची संकल्पना जवाहरलाल नेहरूंनी मांडली आहे. पण सद्याची परिस्थिती पहाता आपण देशाला पुन्हा एकदा काही वर्षं पाठीमागे घेऊन जातोय की काय अशी भिती वाटायला लागली आहे. विज्ञानाशी कोणतीच तडजोड करता येत नसून जवाहरलाल नेहरूंनी विज्ञानावर आधारीत समाज तयार करण्याची संकल्पना मांडली आहे. आज नव्या संसद भवनात जे काही चाललंय, ते याच्या एकदम उलटं चाललंय”, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांनी दिली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “जुन्या संसदेच्या वास्तुशी आमची बांधिलकी असून बांधिलकी मी खासदार आहे म्हणून नाही. तर देशातील कोणत्याही राज्यातील नविन व्यक्तीला दिल्लीत आल्यानंतर संसद, राष्ट्रपती भवन आणि इंडिया गेट या गोष्टी बघण्याचं औत्सुक्य असतं. अलिकडे या सगळ्या वास्तूंचे महत्त्व कमी करण्याचा हा प्रयत्न आहे का हे तपासून पहावं लागेल.” असंही शरद पवार आपल्या प्रतिक्रियेत म्हणाले.