83 वर्षे वय असलेल्या शरद पवारांचा पक्ष पंचविशीत पोहोचला आहे. स्थापना वर्षातच तरुणांची फळी मंत्रीपदी बसवलेल्या पक्षाची वाढ मात्र या पाव शतकात चार पक्षांच्या गर्दीत खुंटली आहे. पवारांच्या नंतर कोण? हा स्वाभाविक विचार आणि त्यातून पक्ष दुभंगाचे आव्हान असतानाच विविध जाती, धर्माच्या, प्रगतीक विचारांचे ग्रामीण आणि शहरी युवक नेतृत्वस्थानी आणण्यास खुद्द पवार गतीने कामाला लागले आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्या राजकारणावर टीका करणारा मोठा वर्ग आहे. तरीही काही तथ्येही किमान अशाप्रसंगी तरी तेही मान्य करतील. राष्ट्रवादी हा महाराष्ट्रातील पुरोगामी म्हणता येईल असा एकच पक्ष आहे. काँग्रेसचे धोरण सुद्धा काही वेळेला लवचिक होते मात्र पवारांचा पक्ष या विचारधारेला बळ देत आला आहे. शरद पवार यांच्या सात दशकांच्या राजकारणाचा आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी वेळोवेळी नामांतर, महिलांचे आरक्षण, मुलींना संपत्तीत वाटा असे प्रागतिक निर्णय. कृषी औद्योगिक प्रगती, साहित्य, कला, क्रीडा, नाटक, चित्रपट, शिक्षण, कृषी, सहकार, उर्जा, जलसंधारण, ग्रामीण विकास, समाजकल्याण, कौशल्यपूर्ण रोजगार निर्मिती अशा सर्व क्षेत्रात निर्माण केलेले अस्तित्व ही पवारांच्या कारभाराची ओळख आहे. तरीही नेतृत्वात असलेल्या ग्रामीण आणि सहकारातील बहुतांशांची जात ही मराठा असल्याने हा मराठ्यांचा पक्ष नगणला गेला आहे. मराठ्यांची प्रगती आणि अधोगती दोन्हीचे हार आणि प्रहार त्यांना सहन करावे लागतात. सहकारी साखर कारखाने, बँका, सूतगिरण्या यांच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थकारणात राष्ट्रवादी खोल रुजलेला आहे. हे जसे त्यांची शक्ती स्थळ आहे तशीच त्यांची मर्यादा आहे. राज्यात शहरीकरण वाढताना ज्या गतीने भाजप आणि शिवसेनेने आपली पकड मजबूत केली तशी पकड राष्ट्रवादीला मजबूत करता आली नाही. तरीही पिंपरी चिंचवडसारखी महापालिका किंवा हिंजवडी आयटी पार्कच्या उभारणीचे श्रेय त्यांना जाते. नवी मुंबई उभारणीत पवार यांचे योगदान मोठे. हा सगळा इतिहास झाला. त्याचे श्रेय वारंवार मिळत नाही. 25 वर्षातील साडे सतरा वर्ष ज्या पक्षाच्या वाट्याला राज्यातील आणि कमी अधिक प्रमाणात केंद्रातीलही सत्ता लाभली तिथे व्यंग आणि
अॅन्टीइनकंबन्सी निर्माण होतेच. त्यातून 20 टक्क्यांच्या पुढे त्यांचा मतटक्का वाढला नाही. ममता बॅनर्जी, जगन मोहन रे•ाr यांच्या काँग्रेसला राष्ट्रवादीला मिळाले नाही. पवारांवर आरोप आणि त्याला प्रतिउत्तर न देण्याची पवारांची भूमिका त्यांना महागात पडली आहे. त्याचा नेटाने प्रतिकार करण्यास अनुयायीही आपल्या संस्थानाच्या भयास्तव पुढे आलेले नाहीत. त्यामुळेच अस्तित्वासाठी पवारांना सोडून सत्ताधारी पक्षप्रवेशासही ते मागे-पुढे पाहत नाहीत. आपली मते आणि पवारांची शक्ती म्हणजे विजय हा त्यांचा प्रदीर्घकाळ ठरलेला फॉर्म्युला आहे. पुलोदचे सरकार स्थापन केले तेव्हापासून आपण कोणाच्याही मागे जाणारे शिलेदार नसून स्वत:ची गादी स्थापण्याची क्षमता त्यांनी दाखवून दिली. त्यामुळेच त्यांचे नाव तीन वेळा पंतप्रधानपदासाठीसुद्धा चर्चेला आले आणि दरबारी नेत्यांच्या पाताळयंत्री विरोधाचेही धनी ठरले. त्यातूनच 1999 साली काँग्रेसमधून त्यांची हकालपट्टी झाली आणि आजच्या तारखेला त्यांनी पक्षाची स्थापना केली. स्थापनेनंतर सहा महिन्यात जनतेने असे काही मतदान केले की त्यामुळे त्यांना पुन्हा काँग्रेसशी जुळवून घेऊन राज्यात सत्ता स्थापन करावी लागली. ही सत्ता पुढे सलग पंधरा वर्षे त्यांच्या ताब्यात होती. या काळात दरबारींना वरचढ ठरतील असे नव्या दमाचे युवा नेते त्यांनी मंत्री केले. महत्त्वाची खाती त्यांच्याकडे सोपवली. त्यावेळी पुढे आलेल्या नेतृत्वातील अजित पवार आणि जयंत पाटील सोडले तर राज्यातील राष्ट्रवादीच्या कुठल्याही नेत्याला स्वतंत्रपणे आपले नेतृत्व सिद्ध करता आलेले नाही. आर. आर. पाटील त्याला अपवाद होते. मात्र ते हयात नाहीत. पवारांसोबत मोठी शक्ती होऊ शकतील अशी क्षमता असणारे छगन भुजबळ हे प्रदेशाध्यक्ष ओबीसीचे मोठे नेते होते. त्यांनी देशात आणि राज्यात ही शक्ती वाढवली नाही. राज्यात मुंडे यांनी त्याचा लाभ घेतला. तेच आदिवासी नेते पिचड यांचे. तेही दूर गेले. रामदास आठवले आणि इतर वंचित नेतेही वेळोवेळी दुरावले. नवे जोडले गेले नाहीत. अलीकडे अजित दादांची बंडखोरी हा पक्षासमोर एक मोठा डोकेदुखीचा विषय आहे. अलीकडेच पवारांनी राजीनाम्याची मोठी खेळी करून पक्षावरील आपली पकड मजबूत केली आणि अजित दादानाही अखेरपर्यंत आपण पक्षासोबत राहू असे जाहीर करावे लागले. 2014 मध्ये भाजपला साथ देणे महाग पडले. 2012-13 साली पृथ्वीराज चव्हाण यांनी अजित पवार मागे लावलेला चौकशीचा ससेमिरा ही भाजपला मिळालेली मोठी देणगी ठरली. त्यामुळेच अनेकदा पक्षाने हेलकावे खाल्ले आणि पक्षातील नेते भाजपमध्ये गेले. 2018-19 पवारांनी महाविकास आघाडी घडवली. पक्ष अडीच वर्षे पुन्हा सत्तेत आला आणि संजीवनी मिळाली. तपास यंत्रणांना घाबरणारे शिलेदार ही पक्षाची ओळख नको म्हणून नव्या दमाचे युवक जिल्हा परिषदेपासून लोकसभेपर्यंत निवडणुकीच्या रणांगणात उतरवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. पवारांना आता शिवसेनेचे कार्यकर्ता मॉडेल आवडू लागले आहे. पण सगळेच पवारांनी करावे असे साठीतल्या नेत्यांनाही वाटणे अजबच. पवारांसमोर या पूर्वाश्रमीच्या तरुण नेत्यांनाही जबाबदार बनवावे लागत आहे. आपण काँग्रेसमधून आलो मात्र आपले मॉडेल काँग्रेसपेक्षा वेगळे आहे हे या पक्षाला भासवता आलेले नाही. त्यामुळेच आज जरी राज्यात आणि देशात विरोधकांची एकत्र शक्ती बनवण्यासाठी पवारांना झटावे लागत असले तरी त्यांचा पक्ष पुढच्या शतकातील अस्तित्व राखणारा बनवायचा तर त्यांच्या अनुयायांना स्वत: पवार बनावे लागणार आहे. त्यासाठी फक्त शिलेदार म्हणून पक्षात बसून राहणे नेत्यांना सोडून द्यावे लागणार आहे किंवा युवा पिढीतील महाराष्ट्र गाजवणाऱ्या चेहऱ्यांना सर्वांना बाजूला ठेवण्याचे धाडस दाखवून पुढे चाल द्यावी लागणार आहे. ते खूपच अवघड. पवार यात समन्वय कसा साधतात हे पहावे लागणार आहे त्यासाठी लोकसभेनंतरचा काळ त्यांची पुन्हा परीक्षा बघेल असे वाटते.
शिवराज काटकर