प्रतिनिधी,विटा
Sangli News : सहा महिन्यात अनेक अधिकाऱ्यांच्या तीन-तीनदा बदल्या झाल्या. आपल्याच आमदारांना सांभाळण्यासाठी सध्याचे सरकार त्यांचे हवे तसे लाड करीत आहे. त्यातून समाधान होत नसल्याने बदल्यांचे राजकारण सुरू आहे,अशी घणाघाती टिका करीत दिवसेंदिवस वातावरण महाविकास आघाडीला पोषक होत आहे .या सरकारमध्ये निवडणूका घेण्याची हिम्मत नाही. बुथ कमिट्या सक्षम केल्यास तुमचा उद्याचा आमदार राष्ट्रवादीचा असेल, असे मत माजी मंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.
खानापूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या बुथ कमिटी पदाधिकाऱ्यांचा मेळावा येथील जय मल्टीपर्पज हॉलमध्ये पार पडला. यावेळी आमदार शिंदे बोलत होते. आमदार अरुण लाड, माजी आमदार सदाशिव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, माजी नगराध्यक्ष वैभव पाटील, अॅङ संदीप मुळीक, विधानसभा क्षेत्राध्यक्ष सुशांत देवकर, तालुकाध्यक्ष किसन जानकर, युवक तालुकाध्यक्ष हर्षवर्धन बागल, शहराध्यक्ष अविनाश चोथे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
यावेळी आमदार शशिकांत शिंदे म्हणाले, भाजपकडे स्वतःची ताकद नाही. राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांना आयात करून त्यांनी पक्ष वाढवला आहे. उद्या आपली सत्ता आल्यानंतर हे लोक पुन्हा आपल्याकडे येणार आहेत. मात्र आता पक्षाने नविन नेतृत्त्वाला संधी देण्याचे धोरण ठेवले आहे. माझ्यासारख्या माथाडी कामगाराच्या मुलाला शरद पवार साहेबांनी संधी दिली. आम्हालाही अमिषे दाखवली जातात. मात्र आम्ही अमिष, दबावाला बळी पडत नाही, असे आमदार शिंदे म्हणाले.
‘माझे घर फोडले मी युती फोडून दाखवतो’
देशातील विरोधी पक्षाची मोट बांधण्याचे काम फक्त शरद पवार करू शकतात. ही लढाई सोपी नाही. सत्तेतील लोक निवडणूका जिंकण्याचे अनेक फंडे वापरत असतात. अनेक राज्ये त्यांनी सत्तेच्या माध्यमातून घेतली. हे चित्र बदलायचे असेल तर इथला खासदार आपल्या विचारांचा असला पाहिजे. पहिले त्यासाठी तयारीला लागा. बुथ कमिट्या सक्षम करा. परवा त्यांनी माझ्या भावाला पक्षात घेतले. त्यांनी माझे घर फोडले, मी त्यांची युती फोडून दाखवतो, असे आव्हान आमदार शिंदे यांनी दिले.
‘…तर सदाभाऊ मागच्या वेळीच आमदार झाले असते’
जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील म्हणाले, गेल्या निवडणूकीत घड्याळाच्या चिन्हावर उभे असते, तर सदाभाऊ पाटील आज विधीमंडळात आमदार म्हणून दिसले असते. जिल्ह्यातील राष्ट्रवादीत मतभेद जरूर आहेत. मात्र कोणतीही किंमत मोजून चारचे सहा आमदार पक्षाचे करण्याची भूमिका आम्ही घेतली आहे.
‘विसापूर सर्कलमधील अडचण पक्षीय पातळीवर सोडवा’
कार्याध्यक्ष अॅङ बाबासाहेब मुळीक म्हणाले, खानापूर तालुक्यातील सर्व गावातून बुथ कमिट्या तयार आहेत. सर्व सेलचे पदाधिकारी क्रियाशील आहेत. गतवेळी माजी आमदार सदाशिव पाटील राष्ट्रवादीतून लढले असते, तर आमदार झाले असते. खानापूर आटपाडीत पक्ष संघटन चांगले आहे. विसापूर सर्कलमधील अडचण पक्षीय पातळीवर सोडवली पाहिजे. या मतदारसंघाचा पुढचा आमदार राष्ट्रवादीचा होईल. पक्ष सक्षम करण्यासाठी ताकद देण्याची गरज आहे, असे मत मुळीक यांनी व्यक्त केले.
स्वागत अविनाश पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन संतोष जाधव यांनी केले. यावेळी राष्ट्रवादी महिला आघाडी जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, तालुकाध्यक्षा सुवर्णा पाटील, शहराध्यक्षा लता मेटकरी, पुनम महापूरे, युवकचे विधानसभा क्षेत्राध्यक्ष हरी माने, शहर कार्याध्यक्ष विशाल शिंदे, राजकुमार पाटील, प्रशांत सावंत, अरविंद कोले, विक्रम शिंदे, विपूल तारळेकर, अॅङ सचिन जाधव, अॅङ विजय जाधव, विकास जाधव, विनोद पाटील, अमित भोसले, माधव रोकडे यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.