खासदार सुप्रिया सुळे यांची पत्रकार परिषदेतून विरोधकावर टीका
प्रतिनिधी/ कराड
महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीसांचे सरकार ज्या पध्दतीने स्थापन झाले आहे हे वैचारीक आणि सुसंस्कृत महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. हे सरकार असंवेदनशील असून त्यांच्याकडे महाराष्ट्राच्या भल्याचा काही विचार नाही. कोण काहीही आणि कोणत्याही थराला जाऊन वागत-बोलत आहे. या सरकारचे कामकाज पाहिल्यानंतर मनाला खूप वेदना होत आहेत, अशी खंत खासदार सुप्रिया सुळे यांनी शुक्रवारी कराड येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केली.
दरम्यान आरएसएस संघटनेवरील बंदीबाबत मागणी होत असेल तर यावर चर्चा व्हायला हवी, असे मतही त्यांनी व्यक्त केले. कराड येथील शासकीय विश्रामगृहात ही पत्रकार परिषद झाली. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, माजी सहकार व पणन मंत्री आमदार बाळासाहेब पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, मानसिंगराव जगदाळे, देवराज पाटील, महिला आघाडीच्या माई साळुंखे, प्रशांत यादव यांच्यासह पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, महाराष्ट्रात सध्या सरकारकडून चुकीच्या पध्दतीने कारभार सुरू आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरू असणारी कामे शिंदे सरकारने बंद केली निधी अडवला. सुसंस्कृत महाराष्ट्राला हे शोभत नाही. विकासकामांवर मोठा परिणाम झाला आहे. आम्ही मागणी केल्यानंतर आत्ता पालकमंत्री नेमले गेले. एका मंत्र्याकडे दोन-तीन तर कोणाकडे याहून अधिक जिह्यांची जबाबदारी देण्यात आल्या आहेत. ते कसे काम करणार त्यांनाच माहीत. पण सध्या जे सुरू आहे ते राज्यासाठी धोक्याचे आहे. हे सरकार किती दिवस टिकेल सांगता येत नाही.
माजी केंद्रीय मंत्री लालूप्रसाद यादव यांनी पीएफआयवरील बंदीप्रमाणे आरएसएसवर बंदीची मागणी केली आहे. यावर मत व्यक्त करताना खा. सुळे म्हणाल्या, अशी मागणी होत असेल तर या विषयावर चर्चा व्हायला हवी. ही चर्चा संविधानाच्या चौकटीत राहून झाली पाहिजे. पंकजा मुंडे यांच्या नाराजीवर खा. सुळे म्हणाल्या, रक्ताची नाती प्रेमाची जिव्हाळ्याची असतात. शेवटी नाती महत्वाची असतात.
यशवंतरावांच्या साहित्याच्या प्रसारासाठी प्रयत्न
स्व. यशवंतराव चव्हाण देशाचे मोठे नेते होते. त्यांचे साहित्य पुढच्या पिढीपर्यंत पोहचावे, यासाठी वायबीसी सेंटरच्या माध्यमातून प्रयत्न सुरू आहेत. चव्हाण साहेबांची पुस्तके स्टोरी टेलवर उपलब्ध केली आहेत. त्यांची अनेक संवेदनशिल पत्रे कराडमध्ये आहेत. ती संग्रहीत करून नव्या पिढीपर्यंत कशी पोहचवता येतील यासाठी तज्ञ मंडळींकडून मार्गदर्शन घेण्यात येत आहे. यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य मोबाईलवर बघता येईल, ऐकता येईल अशी रचना करावयाची आहे. वायबीसी सेंटरच्या माध्यमातून शरद पवार फिलोशिप सुरू करत असून प्रतिवर्षी शिक्षक, शेतकरी आणि साहित्यिक यांची निवड यासाठी केली जाईल. डॉ. अनिल काकोडकर यांच्यासारखी ज्येष्ठ मंडळी यामध्ये मार्गदर्शक म्हणून काम पाहतील. कराड मध्ये प्रतिवर्षी संवादपर कार्यक्रम घेऊन यामध्ये स्व.यशवंतराव चव्हाण यांचे साहित्य, त्यांचे राजकीय, सांस्कृतिक विचार यावर साधक बाधक चर्चा व्हावी, असे नियोजन असल्याचे खा. सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
हे सरकार ईडीचे सरकार आहे. ईडीने केलेल्या कारवायांमध्ये पंच्चांन्नव टक्के कारवाया या विरोधी पक्षांच्या नेत्यांवर झाल्या आहेत. खोक्यांचा विषय तर गल्ली बोळात पोहचला आहे. उलट या सरकारमधील नेते उघडपणे म्हणतात तुम्हाला पाहिजेत काय खोके, यावरून त्यांचे राजकारण कोणत्या थराला गेले आहे हे लक्षात येते असे खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितले.