Rajesh Kshirsagar उद्धव ठाकरे यांना लक्षात यायला हवं कि आपला वापर कसा होत आहे. काही दिवसापूर्वीच अजित पवार डोळा मारत होते. तर काल नाना पटोले सभेला नव्हते हे न कळण्याइतपत राजकारणातील जान उद्धव ठाकरेंना नाही का ? तसेच त्यांचा नाश होत असल्याचे त्यांना कळत नाही का? असा थेट सवाल राजेश क्षिरसागर यांनी उद्धव ठाकरे यांना केला. छत्रपती संभाजीनगर येथे काल झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेला महाविकास आघाडीतील प्रमुख नेते आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर चौफेर टिका केली. राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष आणि शिंदे गटाचे प्रवक्ते राजेश क्षिरसागर यांनी कोल्हापूरात पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांनी केलेल्य़ा आरोपांना उत्तर दिले.
आपल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना क्षिरसागर म्हणाले, “2014 च्या निवडणुकीमध्येच काँग्रेस- राष्ट्रवादी संपली होती. पण 2019 साली उद्धव ठाकरे यांनी त्यांना सोबत घेतले. त्याचीच प्रतिक्रिया म्हणजे एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा भाजप- सेना युती केली. आता विरोधकांना सोबत घेऊन जाव लागत असल्याने ठाकरे गटाला विरोधकांचे बोल बोलावे लागतात हे सर्वात मोठे दुर्दैव आहे. येत्या काळात भाजप- सेनेच्या मागे जनता भक्कमपणाने उभी आहे.”
सावरकर गौरव यात्रेविषयी बोलताना ते म्हणाले, “राहुल गांधी सावरकर यांच्या विरोधात टिप्पणी करतात. कोल्हापुरात भाजप- सेना युतीच्या वतीने उद्या सावरकर गौरव यात्रा निघणार आहे. त्यासाठी हजारोच्या संख्येने तरुणाई उपस्थित राहणार आहे. हिंदू समाजाच्या दृष्ठीने जे जे निर्णय हिताचं घेता येईल ते ते निर्णय केंद्र सरकार घेत आहे. कोणत्याही धर्मावर अन्याय न करता व किंवा त्याला दुखावता हे निर्णय घेत आहे. येत्या काळात सावरकरांना भारतरत्न देण्यास सरकार विचारधीन असेल. हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणत असत कि मी काँग्रेस- राष्ट्रवादीशी युती करेन त्यावेळी मी दुकान बंद करेन. मात्र बाळासाहेबांचा विचारांच्या विरोधात ठाकरे गटाकडून स्टेटमेंट येत आहेत हे हिंदुत्वाचे दुर्दैव आहे.”
शेवटी बोलताना ते म्हणाले, “काहीतरी योग्य विचार करूनच पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री शहांनी एकनाथ शिंदेंकडे मुख्यमंत्री पदाची जबाबदारी दिली आहे. विरोधकांकडून गैरसमज पसरवला जात आहे. पुढच्या काळातही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री राहतील” अशी माहीतीही त्यांनी दिली.