ऑनलाईन टीम / तरुण भारत :
देशात राजे अनेक होऊन गेले. पण आज साडेतीनशे वर्षानंतरही सर्वसामान्यांच्या अंत:करणात राहिलेला राजा कोण असेल, तर ते छत्रपती शिवाजी महाराज. आसाम असो किंवा केरळ एकच नाव येतं ते म्हणजे शिवछत्रपतींचं. कारण त्यांनी भोसल्यांचं राज्य कधी केलं नाही. त्यांनी राज्य केलं ते हिंदवी स्वराज्याचं. राज्य चालवायचं ते रयतेसाठी हा आदर्श शिवछत्रपतींनी संपूर्ण देशाला घालून दिला. अशी भावना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज 350 व्या शिवराज्याभिषेक सोहळय़ाच्या निमित्ताने ऐतिहासिक लाल महालात आयोजित कार्यक्रमात व्यक्त केली.
शरद पवार म्हणाले, आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा. या दिवशी शिवरायांनी राज्य कारभार स्वीकारला. पण राज्य कोणासाठी करायचं? तर राज्य हे सर्वसामान्यांसाठी करायचं. तसेच शक्ती आणि सत्ता जनतेसाठी वापरायची हे सूत्र शिवछत्रपतींनी आपल्यासमोर ठेवलं. या देशात अनेक राजे होऊन गेले, देवगिरीचे यादव, दिल्लीचे मुघल, आदिलशाह होऊन गेले. अशी अनेकांची नावे सांगता येतील ज्यांनी राज्य केलं. पण त्यांचं राज्य त्यांच्या घराण्याच्या नावाने चाललं. पण शिवरायांनी कधीही भोसल्यांचं राज्य केलं नाही. तर राज्य केलं ते हिंदवी स्वराज्याचं. रयतेचं राज्य ते रयतेसाठी चालवायचं, हा आदर्श त्यांनी देशासमोर घालून दिला.
शिवरायांचा राज्याभिषेक झाला. त्यावेळी काही घटकांनी त्याकडे वेगळ्या दृष्टीनेही पाहिले. मात्र, मराठी माणसांनी आपल्या राजाच्या भूमिकेला अंतकरणापासून स्विकारले.