तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कन्व्हेन्शन सेंटर उभारण्यास विरोध
कोल्हापूर प्रतिनिधी
राज्य शासनाकडून छत्रपती राजाराम तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कन्व्हेन्शन सेंटर उभारले जाणार आहे. या सेंटरच्या माध्यमातून तलावात सिमेंटच्या इमारती उभारून शासन काय साध्य करणार आहे, असा प्रश्न उपस्थित करत शिवसेनेचा या सेंटरला विरोध असुन छत्रपती राजाराम तलाव वाचविण्यासाठी जन आंदोलनाचा निर्धार केला आहे. शनिवार ता.10 रोजी सकाळी 8 वाजता तलावात उभे राहुन या जनआंदोलनाला प्रारंभ करणार असल्याचे शिवसेना (ठाकरे गट) जिल्हाप्रमुख संजय पवार यांनी सांगितले. राजाराम तलाव येथे गुरूवारी झालेल्या पर्यावरण प्रेमी, वृक्षप्रेमी, राजाराम तलाव जलतरण मंडळाच्या बैठकीत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राजाराम तलाव जलतरण मंडळाचे अध्यक्ष उदय यवलुजे होते.
जिल्हाप्रमुख पवार म्हणाले, छत्रपती राजाराम तलाव, ऐतिहासिक रंकाळा तलाव, कोटीतीर्थ तलाव शहराची अस्मिता आहे. येथील छत्रपती राजाराम तलावात वृक्ष व स्थलांतरीत पक्षांचे वास्तव्य आहे. शहराच्या सौंदर्यात भर टाकणारा हा तलाव आहे. राज्य शासनाच्या जिल्ह्यात अनेक जागा रिकाम्या आहेत, मग छत्रपती राजाराम तलावाच्या पाणलोट क्षेत्रातच कन्व्हेन्शन सेंटर का उभे केले जात आहे? असा प्रश्न उपस्थित केला. यापूर्वीही छत्रपती राजाराम हायस्कूल बंद करण्याचा प्रयत्न शासनाकडून झाला होता. कोल्हापूरच्या स्वाभिमानी जनतेने तो हाणून पाडला. आता तलावाच्या पाणलोट क्षेत्रात कन्व्हेन्शन सेंटरच्या माध्यमातून इमारती उभारल्या जाणार आहेत. यामुळे तलावाच्या सौंदर्याला बाधा पोहचणार आहे. याला शिवसेनेचा विरोध असुन छत्रपती राजाराम तलाव वाचवा या जन आंदोलनाचा निर्धार केल्याचे सांगितले.
यावेळी जिल्हाध्यक्ष विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, रघुनाथ टिपुगडे, राजु पाटील, माजी सरपंच कावजी कदम, रामा पसारे, प्रविण शहा, दलीम गायकवाड, सुनिल पाटील, प्रकाश गणाचारी, रणजीत यादव, संदीप पाटील, अनिल धनवडे, प्रकाश पोवार आदींसह पर्यावरण, वृक्षप्रेमी उपस्थित होते.