त्या ऐतिहासिक सोहळ्याविषयी भगतरामजी छाबडा यांचे प्रतिपादन
वास्को : ज्या काळात भारतात हिंदु राजा होणे शक्यच नाही असा समज दृढ होता अशा काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वाराज्याची स्थापना केली होती. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत महाराजांनी स्वराज्य घडवीले. हा इतिहास जगाला समजावा. भारतीय हिंदु समाज जागृत व्हावा. हिंदवी स्वराज्याचा संदेश सर्वत्र पोहोचावा हा उद्देश बाळगूनच ऐतिहासिक शिवराज्याभिषेक सोहळा त्या काळी घडला होता असे प्रतिपादन इतिहास तज्ञ भगतरामजी छाबडा यांनी वास्कोत केले. वास्कोतील रवींद्र भवनने आयोजित केलेल्या शिवराज्याभिषेक दिन सोहळ्यात भगतरामजी छाबडा प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते. व्यासपिठावर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार संकल्प आमोणकर, रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव, उपाध्यक्ष डॉ. धर्मेंद प्रभुदेसाई उपस्थित होते. यावेळी प्रमुख पाहुणे, प्रमुख वक्ते व मान्यवरांच्या हस्ते समई प्रज्वलीत करून तसेच शिवप्रतीमेला फुले वाहून छत्रपतींचे स्मरण करण्यात आले.
यावेळी प्रमुख वक्ते या नात्याने बोलताना भगतरामजी छाबडा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेविषयी आणि काही ऐतिहासिक प्रसंगांची थोडक्यात माहिती दिली. छत्रपती शिवराय एwशारामात जीवन जगले असते. त्यांना हवे ते मिळाले असते. मात्र, शिवरायांनी अगदी कोवळ्या वयात हिंदवी स्वराज्य स्थापनेचे स्वप्न पाहिले. वयाच्या पंधराव्या वर्षी त्यांनी स्वराज्याची मुहुर्तमेढ रोवली आणि मावळ्यांच्या साथीने हिंदवी स्वराज्याचे स्वप्न साकार केले. अत्यंत प्रतिकुल परिस्थितीला सामोरे जात महाराजांनी ध्येय गाठले. त्यांच्या कतृत्वामुळेच हिंदुस्थानात मोघलांचे साम्राज्य कोसळले. ज्यावेळी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापनेचा विडा उचलला, त्या काळात महाराजांना खुळ्यात काढले गेले. हिंदु राजा निर्माण होणे शक्यच नाही असा त्या काळी समज होता. त्यावर छत्रपती शिवरायांनी मात केली. बलाढ्या मोघलांना नमवले. प्रतिकुल काळात निर्माण केलेला हा इतिहास जगाला समजावा व हिंदुस्थान जागृत व्हावा म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक करण्यात आला असे छाबडा म्हणाले. स्वराज्य स्थापनेची गोष्ट सहज सोपी नव्हती. महाराजांना स्वकीयांना आधी जागृत करावे लागले. अनेक रितीरीवाज त्यांच्या ध्येयाच्या आड येऊ लागले. महाराजांनी या कुप्रथा दूर सारून मार्गक्रमण केले. गुलामगीरीमुळे आपला समाज राष्ट्रीयता विसरला होता. अशा काळात अठरा पगड समाजाला त्यांनी एकत्र केले. त्यांच्यात राष्ट्रीयत्वा ज्योत पेटवली. राष्ट्रीयत्वाने भारलेला एखादा सामान्य माणूसही काय करू शकतो याची प्रचीती आपल्याला तानाजी मालसुरेंच्या कोंढाणा जिंकण्याच्या इतिहासातून येते असे भगतरामजी छाबडा यांनी पटवून दिले. लाखोंचा पोशिंदा वाचवा म्हणून शिवा काशिद यांनी बलीदान कसे दिले याचीही माहिती त्यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन हे हिंदवी स्वराज्याला समर्पीत होते. आयुष्यातील प्रत्येक क्षण त्यांनी स्वराज्यासाठी दिला. 35 वर्षे त्यांनी राष्ट्रीयत्वाचा ध्वनी चेतवीला. निराश समाजात चैतन्य निर्माण केले. त्यामुळेच मोघलांचा निपात झाला. छत्रपतींनी सत्तेसाठी राज्य चालवले नाही. आज भारतात काही लोक हिंदु राष्ट्र होईल म्हणून चिंता व्यक्त करतात. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यात एखादी मशिद पाडल्याचा उल्लेख इतिहासात नाही. हेच हिंदु राष्ट्र आहे असे भगतरामजी छाबडा म्हणाले. या कार्यक्रमात आमदार संकल्प आमोणकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी विचार मांडले. रवींद्र भवनचे अध्यक्ष जयंत जाधव यांनी उपस्थितांचे स्वागत केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रवेश आमोणकर यांनी केले.