छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकास 350 वर्षे होत असून आणखी 7 वर्षानी त्यांच्या जन्मकालास 400 वर्षे होतील. अफाट शौर्य, प्रचंड धाडस, गनिमी कावा व युद्धनीतीचा आदर्श असणारा हा नवयुगाचा प्रारंभ करणारा राजा खऱ्या अर्थाने ‘रयतेचा राजा’ म्हणून आजही जनमानसात स्फूर्तीदाता आहे. ‘शिवाजी’ हे नाव आणि त्यासोबत भवानी तलवार, अफझलखानाचा वध, आग्राहून सुटका असे अनेक नाट्यामय प्रसंग समोर येतात. अत्यल्प साधनाच्या आधारे प्रचंड मोठे साम्राज्य निर्माण करण्यात ते एकमेव ठरतात. आपल्या साम्राज्याला नैतिकतेचा आधार व गरीबांचा कैवार त्यांनी हेतूपूर्वक अंमलात आणला. छत्रपती शिवाजी महाराजांनी गड-किल्ले ताब्यात घेतले आणि जुलमी आदिलशाहीला अनपेक्षित असा भक्कम पर्याय तयार केला. त्यांचे राजकीय कर्तृत्व, पराक्रम या सोबतच कल्याणकारी राज्याची मुहूर्तमेढ त्यांनी रोवली. या सर्व यशस्वी मोहिमेत आवश्यक असणारी पूर्वतयारी व वित्तपुरवठा याबाबत छत्रपतींचा आर्थिक बाजूने फार मर्यादीत अभ्यास झाला असून त्यांच्या अर्थकारणाची, धोरणाची माहिती शिवरायांची अर्थनीती समजून घेतल्याने शिवरायांच्या यशामागील अर्थकारण स्पष्ट होईल.
छत्रपतींच्या उत्पन्नाचा मुख्य घटक हा विविध लढायातून मिळालेली खंडणी, देणगी हा होता. पण त्याचबरोबर सातत्यपूर्ण उत्पन्नासाठी विविध प्रकारचे कर आकारले जात. सध्याच्या तुलनेत त्यांच्याकडे उपलब्ध असणारी उत्पन्नाची साधने मर्यादीतच होती. अनेकवेळा टंचाईची स्थिती निर्माण होई. सुरतची लूट करण्यामागे हे महत्त्वाचे कारण होते. शेती आणि उपव्यवसाय हाच ग्रामीण व्यवस्थेचा, उत्पन्न व रोजगाराचा मार्ग होता. आदिलशाहीच्या काळात सक्तीने करवसुली एवढेच तंत्र होते. त्याऐवजी शेती व शेतकरी आर्थिकदृष्ट्या अडचणीत येणार नाही याची शिवरायांनी काळजी घेतली. सावकाराकडून भरमसाठ दराने कर्ज घ्यायला लागू नये यासाठी दुष्काळ परिस्थितीत केवळ करमाफी न करता पुढील लागवडीसाठी बियाणे दिले जाई. शेतीवर चौथाई कर आकारणीची पद्धत स्वीकारली व त्यामध्ये जमिन धारणा हा निकष न ठेवता त्यातून कोणते पीक घेतले जाते यावर भर दिला. आधुनिक कर व्यवस्थेत ‘क्षमतेनुसार कर’ हे महत्त्वाचे तत्व मानले जाते त्याचा अवलंब शिवशाहीत झाला होता हे स्पष्ट होते. ग्रामीण कारागिर, व्यावसायिक यांना स्थानिक बाजारपेठेसोबत आपल्या वस्तू बाहेर विकण्यास प्रोत्साहन दिले. पडीक जमिनी लागवडीखाली आणणे, फक्त लागवडीखालील जमिनीवर कर आकारणे, कालव्यातून पाणी पुरवठा, आपत्ती व दुष्काळात सरकारी खजिन्यातून मदत ही शिवनीती आजही मार्गदर्शक ठरते.
त्रूटीचे अर्थकारण
आपल्या साम्राज्याचा विशेषत: लढाईसाठी लागणारा खर्च भागविण्यासाठी आदिलशाही व विजापूर भागातून लूट केली जाई. सुरतेची दोनवेळा 1664 व 1670 मध्ये लूट केली आणि प्रथम 1 कोटी व नंतर 75 लाखाची लूट केली. दुसऱ्या लुटेचा मुख्य उद्देश मुघल तुमचे संरक्षण करू शकणार नाहीत. शिवाजी केव्हाही येऊ शकतो असे भय निर्माण करण्यासाठी होती. यातही सावकार, व्यापारी यांना कैदी म्हणून पकडले जाई. त्यांच्याकडून प्रथम त्यांचा व्यापार, मिळणारा नफा याची माहिती घेऊन त्यांच्याकडून खंडणी घेतली जाई. सुरतवर स्वारी करण्यापूर्वी सहा महिने अगोदर ‘रेकी’ केली होती यावरून ‘नियोजनबद्ध’ आक्रमणाचे व शत्रुला गाफील ठेवून हल्ला करण्याचे तंत्र त्यांच्याकडे होते हे स्पष्ट होते.
जकात उत्पन्न व व्यापार
आपल्या साम्राज्याचा भक्कम आर्थिक पाया हा व्यापार व जकात उत्पन्नातून मिळवण्याची महत्त्वाची नीती शिवरायांनी अवलंबिली होती. ज्याच्या हाती किल्ले- त्याच्या नियंत्रणात भूमी व ज्याच्याकडे जहाजे त्याच्याकडे सागरी सत्ता या सूत्रांचा पूर्ण वापर करीत मोक्याची ठाणी, किल्ले ताब्यात घेतले. अफजलखानचा वध केल्यानंतर केवळ 18 दिवसात ‘पन्हाळा’ जिंकला. पन्हाळा हा कर्नाटक व गोवा व्यापारास महत्त्वाचे ठाणे होते. व्यापार मोठ्या प्रमाणात असल्याने जकात उत्पन्नही मोठे होते. पन्हाळ्याच्या लढाईत राजापूरच्या ब्रिटीश अधिकाऱ्याने सिद्दी जोहरला तोफा दिल्या. याचा बदला घेण्यासाठी राजापूरचा ताबा घेतला व तेथे अण्णाजी पंडितना नेमले. राजापूर हल्ल्यात ब्रिटीशांचे 1 लाख होन नुकसान झाले. ती भरपाई देण्याचे मान्य केले. परंतु त्याबाबतचा करार होण्यास प्रदीर्घ काळ घेतला. हा करार राज्याभिषेकापूर्वी करण्यात आला तरी ब्रिटीशांना शिवाजी ही भरपाई देतील याची खात्री नव्हती. त्यासाठी मक्केहून येणारे अण्णाजी पंडीतचे जहाज ताब्यात घेतले हे सर्व शिवाजीराजेंची व्यापार व्यवहार कुशलता दर्शवतात.
राजापूर बंदरातून होणारा विदेशी व्यापार हा मक्का, इराणचे बसरा अशा विविध ठिकाणी होता. स्वस्त मीठ आपल्या प्रदेशात आल्याने आपल्या प्रदेशातील लोकांचे उत्पन्न व रोजगार कमी होईल म्हणून मिठावर कर लादला! व्यापार संरक्षण नितीचा हा उत्तम वस्तुपाठ होता. व्यापारात दक्षता, कुशलता मोठ्या प्रमाणात लागते. यासाठी अरेबियन जहाजावर 3-4 युरोपियन लोकांना नेमले होते. अरेबियन समुद्रात व्यापार तंटे किंवा इतरप्रश्न निर्माण झाले तर ते युरोपियन सोडवतील ही त्यामागे भूमिका होती. सागरी व्यापारासाठी आवश्यक असणारे आरमार उभे करणारे छत्रपती शिवाजी कुशल व्यापारनीतीत परकीयांच्यापुढे एक पाऊल होते.
प्रारंभी पोर्तुगीजांची सागरी सत्ता मोठ्या प्रमाणात होती. इतर व्यापारी जहाजांना व्यापार परवाना फी द्यावी लागे. ही त्यांची मक्तेदारी मोडण्याचे व आपले व्यापार वर्चस्व तयार करण्याचे महत्त्वाचे कार्य राजेंनी निस्तेजकपूर्वक पूर्ण केले. व्यापारात नाक दाबले तर तोंड उघडते हे दबावतंत्र अनेकदा राजेंनी वापरले. ब्रिटीशांकडून राजे बंदुका व शस्त्रे खरेदी करत. जेव्हा ब्रिटीशांनी(मुंबई) शस्त्र खरेदी उधारीवर देण्याचे नाकारले तेव्हा त्याला लाकूड व तांदूळ यांचा पुरवठा तोडला. यानंतर ब्रिटीशांनी शिवाजीच्या अटी मान्य केल्या. नाशिकजवळील साल्हेर मुल्हेर हे सुरत व्यापार केंद्राला जोडणारे महत्त्वाचे ठाणे होते. हे ताब्यात तर घेतलेच 1 कोटीचे जडजवाहिरे व 2000 घोडे मिळवले.
छत्रपतींच्या केवळ शौर्याच्या नाट्यापूर्ण तपशीलापेक्षा व्यवहार धुरंधर शिवाजी हे ‘इंद्रावर हल्ला व कुबेराची लूट’ हे तत्व वापरत होते हे स्पष्ट होते. राजकारणाची यशस्वीतता भक्कम अर्थकारणावर असते हा संदर्भ बिंदू महत्त्वाचा असून जागतिक स्पर्धेत व्यापार वाटाघाटी किती सावधपूर्वक कराव्यात हे शिवरायांच्या व्यापारी धोरणातून मिळते. 2030 मध्ये शिवरायांच्या 400 व्या जन्मोत्सवात भारत जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकापर्यंत जाण्याच्या शक्यता निर्माण झालेल्या असताना शिवरायांचे अर्थकारण दीपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शक ठरते.
प्रा.डॉ. विजय ककडे