छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेकाच्या 350 व्या उत्सव दिनी पंतप्रधान मोदींचे प्रशंसोद्गार
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
छत्रपती शिवाजी महाराज हे महान प्रेरणेचे स्रोत असून त्यांनी आपल्या पराक्रमाने लोकांची गुलामीची मानसिकता नष्ट केली, अशा शब्दांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना अभिवादन केले आहे. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला 350 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी हा संदेश दिला आहे.
आपल्या राज्यातील नागरिकांचे कल्याण हे शिवाजी महाराजांचे पायाभूत तत्व होते. महाराज अत्यंत साहसी तसेच प्रशासकीय कौशल्यात निपुण होते. त्यांचा राज्याभिषेक ही भारताच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाची घटना आहे. आपल्या जनतेला प्रोत्साहित करणे, सक्रीय ठेवणे आणि जनतेचा आत्मविश्वास वाढविणे, हे प्रत्येक राज्यप्रमुखाचे कर्तव्य असते. शिवाजी महाराजांनी केवळ आक्रमकांचा पराभव केला असे नव्हे, तर स्वराज्याची स्थापना केली जाऊ शकते, हा विश्वास त्यांनी जनतेच्या मनात जागृत केला, असे प्रतिपादन त्यांनी केले.
आदर्श आजही उपयोगी
आजच्या स्थितीतही शिवाजी महाराजांनी घालून दिलेले आदर्श उपयोगी आहेत. आजही ते आमचे प्रेरणास्रोत आहेत. ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ ही संकल्पना त्यांच्याच प्रेरणेचे द्योतक आहे. आमच्या सरकारने याच प्रेरणेतून नौदलाला नवीन चिन्ह दिले. शिवाजी महाराजांनी त्यांच्या नौदलाचा मोठ्या प्रमाणात विस्तार केला. त्यांनी सागरी दुर्गांची निर्मिती करुन आपल्या सागरी सीमांचे संरक्षण केले. त्यांच्या या धोरणी नेतृत्वाचा आदर राखण्यासाठी आम्ही नौदलाच्या ध्वजावरचे सेंट जॉर्जचे क्रॉस चिन्ह काढून त्याच्यास्थानी शिवाजी महाराजांची राजमुद्रा घेतली आहे. त्यांच्या आदर्शांच्या आधारावरच आमची धोरणे आहेत, असे प्रतिपादन त्यांनी केले.
स्वराज्याची स्थापना कष्टपूर्वक
शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना अत्यंत कष्टपूर्वक केली होती. त्यासाठी त्यांना त्यांच्यापेक्षा प्रबळ शत्रूंशी दोन हात करावे लागले होते. त्यांनी बुद्धीकौशल्य आणि पराक्रम यांच्या संयोगातून हे ध्येय साध्य केले. ते करण्यासाठी त्यांनी सहस्रावधी सहकाऱ्यांना या कार्यात सहभागी होण्याची प्रेरणा दिली. परिस्थितीनुसार योग्य ते निर्णय घेऊन त्यांनी आपल्या शत्रूंना नमवत स्वराज्य स्थापन करुन भारताचा इतिहास घडविला, असेही प्रशंसोद्गार पंतप्रधान मोदींनी काढले.