शिवसेनेतील बंडाळीनंतर गेले अनेक दिवस चाललेल्या वादाचा एक महत्वपुर्ण निकाल आज निवडणुक आयोगाने दिला आहे. शिवनसेनेचे चिन्ह धनुष्य बाण आणि पक्षाचे शिवसेना हे नाव शिंदे गटाच्या पारड्यात टाकले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात ही एक मोठी आणि ऐतिहासिक घटना मानली जात असून हा ठाकरे गटाला सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. निवडणुक आयोगाच्या या निर्णयाने महाराष्ट्राच्या राजकारणात मोठ्या घडोमोढी घडण्याच्या शक्यता आहेत.
भारतीय निवडणूक आयोगाने (ECI) या संबंधीचा निकाल देताना म्हटले आहे की, 2019 च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या विजयी आमदारांपैकी 76 टक्के आमदारांनी एकनाथ शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. तर उद्धव ठाकरेंचच्या समर्थनार्थ केवळ २३.५ टक्के इतके आहे. पक्षाचे ‘शिवसेना’ हे नाव आणि पक्षाचे धनुष्य- बाण हे चिन्ह एकनाथ शिंदे गटाकडे कायम राहील असे म्हटले आहे.
जून २०२२ मध्ये एकनाथ शिंदे यांनी सत्तापालट केल्यावर पक्षात दोन गट पडले. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांमध्ये पक्ष विभागला गेला होता. एकनाथ शिंदे यांच्यामुळे झालेल्या सत्तापालटामुळे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार कोसळले आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या नात्याने तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री शपथ घेतली होती.
आपणच ‘खरी शिवसेना’ म्हणून ओळखल्या जाण्यावरून दोन्ही गट एकमेकांशी भांडत होते. त्यानंतर हे प्रकरण शिवसेना पक्षाचे नाव आणि चिन्हावर दावा सांगण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडे गेले होते.
ऑक्टोबर 2022 मध्ये, निवडणूक आयोगाने शिवसेनेचे धनुष्य आणि बाण चिन्ह गोठवून दोन्ही गटांना वेगवेगळी नावे आणि चिन्हे दिली होती. शिंदे गटाला बाळासाहेबांची शिवसेना (बाळासाहेबांची शिवसेना) हे नाव दोन तलवारी आणि ढाल पक्षाचे चिन्ह म्हणून देण्यात आले होते. तर उद्धव ठाकरे गटाला शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मशाल हे हे चिन्ह देण्यात आले होते.