ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे शिवप्रताप दिवस साजरा करण्यासाठी प्रतापगडावर (Pratapgarh) गेले आहेत. यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्र्यांना या मुद्यावरून धारेवर धरले आहे. राऊत म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना प्रतापगडावर जाऊन छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्याचा अधिकार नाही. मुख्यमंत्री शिंदे यांचं हे ढोंग आहे, असा थेट हल्लाबोल संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. तसेच उदयनराजे यांच्या डोळ्यातील अश्रु हे महाराष्ट्राचे अश्रु आहेत असे म्हणत त्यांनी त्यांची पाठराखण देखील केली आहे.
शिवप्रताप दिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आज प्रतापगडावर गेले आहेत. तिथे जाऊन त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केले. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं हे ढोंग आहे, असा थेट हल्लाबोल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला आहे. मुख्यमंत्री आणि त्यांचं सरकार हतबलतेने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान पाहते आणि गडावर जाऊन शिवजयंती साजरे करते हे ढोंग आहे, असं संजय राऊत म्हणाले. मुंबईत आज ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
शिवप्रताप दिन साजरा करणे हे राज्य सरकारचे ढोंग आहे. आम्ही उदयनराजे यांचे अश्रू पाहिले आहेत. ते छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत. त्यांचे अश्रू हे महाराष्ट्राचे अश्रू आहेत. त्यांनी जनतेची भावना व्यक्त केली आहे. ज्या राज्यपालांनी महाराजांचा अपमान केला, त्या राज्यपालांच्या व्यक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी धिक्कार करणे गरजेचे असताना, त्यांनी याबद्दल एक शब्द देखील काढला नाही.
शिवप्रताप दिनाचं महत्त्व समजून घ्या. शिवाजी महाराजांच्या अपमानानंतर आपण राज्यपालांचा धिक्कार केला असता, त्यांना परत पाठवण्याची मागणी केली असती, तर आजच्या शिवप्रताप दिनाचं महत्त्वं वाढलं असतं, असं संजय राऊत म्हणाले.
महाराष्ट्राचा आणि शिवरायांचा अपमान करणारे राज्यपाल आजही राजभवनात आहेत. सरकार तोंड शिवून बसले आहे. तिकडे भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शिवरायांचा अपमान करूनही खुर्चीवर बसले आहेत. अशावेळी मुख्यमंत्र्यांना गडावर जाऊन शिवाजी महाराजांना अभिवानद करण्याचा अधिकार आहे का? असा प्रश्न जनता विचारते आहेत, अशी टीका संजय राऊतांनी केली.