राज्यात आजपासून शैक्षणिक वर्षारंभ
पणजी : असह्य उकाड्यामुळे प्रत्येकजण चातकाप्रमाणे पावसाची प्रतीक्षा करू लागला असला तरी हवामान खात्याच्याही अंदाजांना चकवा देत पाऊस आज-उद्या करू लागला आहे. त्याच उकाड्याच्या पार्श्वभूमीवर आजपासून राज्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळा मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार आहेत. सुमारे दोन महिन्यांच्या सुट्टीनंतर राज्यात शैक्षणिक वर्ष प्रारंभ होत असून सुमारे अडीच लाख मुले नव्या उमेदीने मुले शाळेत प्रवेश करणार आहेत. पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण देणाऱ्या सुमारे दोन हजार शाळा-महाविद्यालये राज्यात गावोगावी आहेत. त्यांचे परिसर आजपासून विद्यार्थ्यांच्या गर्दीने फुलून निघणार आहेत. उन्हाळ्याची सुट्टी संपवून पावसाच्या आगमनाच्या पर्वातच शैक्षणिक वर्षही प्रारंभ होत असते. त्यामुळे दप्तर, गणवेश यांच्या जोडीनेच पावसापासून सुरक्षेची साधने अर्थात छत्री-रेनकोट यांचीही खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. गत आठवडाभरात याच साहित्याच्या खरेदीसाठी पालकांनी गर्दी केलेली दिसून आली. हल्लीच्या वर्षात विद्यार्थ्यांना सरकारकडूनच क्रमिक पुस्तके पुरविण्यात येतात. त्यामुळे पहिली ते आठवी पर्यंतच्या विद्यार्थांच्या पालकांचा पुस्तके खरेदीवरील आर्थिक भार किंचित हलका होण्यात मदत होत असते. ही क्रमिक पुस्तके यापूर्वीच बहुतेक सर्व शाळांच्या ताब्यात देण्यात आली आहेत. त्यामुळे शाळा सुरू झाल्याच्या पहिल्या दिवसापासूनच त्यांचे विद्यार्थ्यांना वितरण सुरू होणार आहे. आपल्या गावापासून दूरच्या परिसरात शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी बालरथ देण्यात आले असून दोन महिन्यांच्या विश्रांतीनंतर तेही आजपासून विद्यार्थ्यांच्या सेवेत ऊजू होणार आहेत. त्याशिवाय खास विद्यार्थी वाहतुकीसाठी कार्यरत कदंबच्या बसेस आणि काही खाजगी मिनी बसेसचीही वर्दळ शाळांच्या परिसरात दिसून येणार आहे. वरीलपैकी कोणत्याही व्यवस्थेचा लाभ न घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांनाही दैनदिन कामाव्यतिरिक्त ही जादा ड्युटी करावी लागणार आहे.