मुंबईविरुद्ध रणजी फायनल ः मुंबई 8 गडी हाताशी असताना 49 धावांनी पिछाडीवर
बेंगळूर / वृत्तसंस्था
रजत पाटीदारने आपला क्लास दाखवत दमदार शतक झळकावल्यानंतर मध्यप्रदेशने मुंबईविरुद्ध रणजी फायनल लढतीत सर्वबाद 536 धावांपर्यंत जोरदार मजल मारली. शनिवारी चौथ्या दिवसअखेर मुंबईने 2 बाद 113 धावा जमवल्या. अद्याप 8 गडी बाकी असताना मुंबईचा संघ यावेळी अद्याप 49 धावांनी पिछाडीवर होता. दिवसभरातील खेळात पावसामुळे किंचीत व्यत्ययही आला.
चहापानानंतर पुन्हा खेळाला सुरुवात झाल्यानंतर मध्यप्रदेशने पहिल्या डावाअखेर 162 धावांची अतिशय महत्त्वपूर्ण आघाडी प्राप्त केली. यात पाटीदारच्या 122 धावांच्या खेळीचा सिंहाचा वाटा ठरला. त्याने 219 चेंडूंचा सामना करत 20 चौकार फटकावले. तुषार देशपांडेने त्रिफळा उडवत त्याची खेळी संपुष्टात आणली.
या सामन्यात दोन्ही संघांतर्फे आतापर्यंत 4 शतके झळकावली गेली असून चिन्नास्वामी स्टेडियमची खेळपट्टी अगदी चौथ्या दिवशीही फलंदाजांसाठी नंदनवन ठरली आहे. दिवसअखेर खेळ थांबवण्यात आला, त्यावेळी मुंबईने 2 बाद 113 धावा केल्या. यात पृथ्वी शॉ (52 चेंडूत 44) व हार्दिक तमोरे (32 चेंडूत 25) यांचा वाटा मोलाचा राहिला. अर्थात, फटकेबाजी करण्याच्या प्रयत्नात हे दोन्ही फलंदाज बाद झाले आणि मुंबईसाठी हा मोठा धक्का ठरला.
पृथ्वी शॉला आऊटसाईड ऑफ स्टम्प गोलंदाजी करण्याचा क्लासिक प्लॅन बाद करुन गेला. त्याने गौरव यादवच्या चेंडूवर कव्हरवर तैनात दुबेकडे सोपा झेल दिला. आता आज शेवटच्या दिवशी 95 षटकांचा खेळ बाकी असताना मुंबईला विजयाची अपेक्षा बरीच कमी असेल, असे चित्र आहे. चमत्कार घडला तरच त्यांना विजय खेचून आणण्याची अपेक्षा करता येणार आहे. अगदी चौथ्या दिवसापर्यंत येथील खेळपट्टीला तडे गेले नव्हते. त्यामुळे, मध्यप्रदेशचा चौथा डाव गडगडेल, अशी अपेक्षाही कितपत व्यवहार्य ठरेल, हा कळीचा प्रश्न आहे.
पाटीदारचा जोरदार वरचष्मा
शनिवारी चौथ्या दिवसाचा खेळ सुरु झाला, त्यावेळी मध्यप्रदेशला डावाअखेर आघाडी घेण्यासाठी केवळ 7 धावांची गरज होती. पण, त्यांच्यासाठी याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे पाटीदारने किमान एक सत्र खेळून काढणे आवश्यक होते आणि ही अपेक्षा पाटीदारने यशस्वीरित्या पूर्ण केली. पाटीदारने तिसऱया दिवसातील 13 चौकारात येथे आणखी 7 चौकारांची भर घातली. तो 219 चेंडूत 122 धावांवर बाद झाला, त्यावेळी मध्यप्रदेशची आघाडी 100 पेक्षा अधिक धावांवर पोहोचली होती. तुषार देशपांडेने एका अप्रतिम ऑफकटरवर पाटीदारचा त्रिफळा उडवला.
मध्यप्रदेशने एकूण 14 तास 2 मिनिटे फलंदाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना चांगलेच जेरीस आणले, हे ठळक वैशिष्टय़ ठरले. पाटीदारने प्रारंभीच मोहित अवस्थीला ऑन ड्राईव्हचा चौकार फटकावत आपले आक्रमक इरादे स्पष्ट केले. नंतर कव्हर पॉईंटकडे आणखी एक जोरदार फटका मारत मध्यप्रदेशला डावाअखेर महत्त्वपूर्ण आघाडी मिळवून दिली. सामना अनिर्णीत राहिल्यास या आघाडीच्या बळावरच मध्यप्रदेशचा संघ विजेता ठरु शकतो.
शम्स मुलानीचे डावात 5 बळी
मुंबईतर्फे शम्स मुलानीने 5 बळी घेतले. मात्र, यासाठी त्याला 63.2 षटकात 173 धावा मोजाव्या लागल्या. याशिवाय, तुषार देशपांडेने 116 धावात 3 तर मोहित अवस्थीने 93 धावात 2 बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई पहिला डाव ः सर्वबाद 374.
मध्यप्रदेश पहिला डाव ः 177.2 षटकात सर्वबाद 536 (यश दुबे 133, शुभम शर्मा 116, रजत पाटीदार 219 चेंडूत 20 चौकारांसह 122, सारांश जैन 97 चेंडूत 7 चौकारांसह 57, आदित्य श्रीवास्तव 25. अवांतर 14. शम्स मुलानी 63.2 षटकात 5-173, तुषार देशपांडे 36 षटकात 3-116, मोहित अवस्थी 2-93). मुंबई दुसरा डाव ः 22 षटकात 2 बाद 113 (पृथ्वी शॉ 52 चेंडूत 3 चौकार, 2 षटकारांसह 44, हार्दिक तमोरे 25, अरमान जाफर 34 चेंडूत नाबाद 30, सुवेद पारकर 14 चेंडूत नाबाद 9. अवांतर 5. कुमार कार्तिकेय, गौरव यादव प्रत्येकी 1