आपण बहुतेक सर्वानी ‘साधी राहणी उच्च विचारसरणी’ हा वाक्प्रचार ऐकलेला आहे, काहींनी यातून प्रेरणा घेऊन जीवनात हे तत्त्व पालन करण्याचा प्रयत्नही केला असेल. काही लोकांनी ‘साधी राहणी’ हीच ‘उच्च विचारसरणी’ अशा अर्थाने आपापल्या आकलनानुसार या प्रेरणादायी बोधवाक्मयाचा अर्थ काढला असेल. पण दोन्ही गोष्टी एकमेकास पूरक आहेत हे निश्चित. जोपर्यंत ‘उच्च विचार’ जीवनात नाहीत तोपर्यंत ‘साधी राहणी’ शक्मय नाही किंवा जोपर्यंत ‘साधी राहणी’ नाही तोपर्यंत ‘उच्च विचारांचे’ ध्येय प्राप्त करणे शक्मय नाही. संत तुकाराम महाराजांच्या एका सुंदर अभंगात या दोन्हीचा ताळमेळ घालून गृहस्थ जीवन कसे यशस्वी करता येते याचे वर्णन आहे. ते म्हणतात, जोडोनिया धन उत्तम वेव्हारे । उदास विचारे वेच करी ।।1।। उत्तमाची गती तो एक पावेल। उत्तम भोगील जीव खाणी ।।2।। परउपकारी नेणें परनिंदा। परस्त्रिया सदा बहिणी माया ।।3।। भूतदया पशूंचे पालन । तान्हेल्या जीवन वनमाजी।।4।। शांतिरूप नव्हे कोणाचा वाईट । वाढवी महत्त्व वडिलांचे ।।5।। तुका म्हणे हेचि आश्रमाचे फळ । परम पद बळ वैराग्याचे ।।6।।अर्थात ‘धर्म नीतीला अनुसरून आणि प्रामाणिकपणे जी व्यक्ती उत्तम व्यवहाराने धन मिळविते तसेच आसक्ती न ठेवता उदास वृत्तीने खर्च करते तीच व्यक्ती उत्तम गती प्राप्त करेल आणि या जगातही उत्तम सुख प्राप्त करेल. जी व्यक्ती दुसऱयावर नेहमी उपकार करते, परनिंदा करत नाही, परस्त्रीला माता-बहिणीप्रमाणे मानते, हृदयामध्ये इतर जीवांबाबत करुणाभाव (दयाभाव) ठेवते, पशूंचे पालन करते, तान्हेल्याला पाणी देते, आपली वृत्ती शांत ठेवून कोणासोबतही वाईट व्यवहार करीत नाही. अशी व्यक्ती आपल्या वडिलांची कीर्ती वाढविते. तुकाराम महाराज म्हणतात, अशा निरपेक्ष भावनेने जगणाऱया गृहस्थाश्रमी स्त्री-पुरुषांनासुद्धा परम पद प्राप्त करण्यासाठी लागणारे वैराग्याचे बळ प्राप्त होते.
जीवनामध्ये ‘उत्तम गती’ प्राप्त करणे ही ‘उच्च विचारसरणी’ असावी आणि त्याप्रमाणे जीवन साधेपणाने कसे जगावे याचे सुंदर मार्गदर्शन येथे आहे. श्रीमद भागवत मध्ये वर्णन येते (1.2.10) कामस्य नेन्दयिप्रीतिर्लाभो जीवेत यावता ।जीवस्य तत्त्वजिज्ञासा नार्थो यश्चेह कर्मभिः अर्थात ‘इंद्रिय तृप्ती हा जीवनाचा उद्देश मुळीच नसावा, केवळ निरोगी जीवनाची किंवा आत्मरक्षणाची इच्छा करावी. कारण मनुष्यजन्म परम सत्याविषयी जिज्ञासा करण्यासाठी आहे. कर्माचे याशिवाय दुसरे कोणतेच ध्येय असू नये. ‘सांसारिक जीवनात राहूनही आपण या जगात मनुष्य जन्माचे सार्थक कसे करू शकतो याविषयी सांगताना येथे सांगितले आहे की ‘परम सत्याचा शोध’ ही उच्च विचारसरणी असावी आणि भगवान श्रीकृष्ण हे ते परम सत्य आहे ‘सत्यम परम धीमहि’. आपल्या जीवनातील प्रत्येक क्षण हा भगवान श्रीकृष्णाशी जोडणे ही ‘उच्च विचारसरणी’ आहे आणि ते प्राप्त करून देणाऱया मार्गाला धर्म मार्ग म्हटलेले आहे. जो गृहस्थ आपल्या कुटुंबासमवेत हरिभक्तीमध्ये हे ध्येय ठेवून कुटुंबामध्ये राहतो तो दुर्मीळ मनुष्य जन्माचे सार्थक करतो. अशी व्यक्ती इतर सर्वांप्रमाणे व्यवहार करत असताना दिसत असली तरी त्याच्या श्रीकृष्णासंबंधी असलेल्या समर्पणामुळे त्याला वैराग्य प्राप्त होते. आश्रम कोणताही असो आपल्याकडे जे काही आहे ते प्रामाणिकपणे, अनासक्तवृत्तीने भगवान श्रीकृष्णांच्या सेवेमध्ये अर्पण करणे हेच खरे वैराग्याचे लक्षण आहे.
उत्तम व्यवहार करून धनार्जन करणे, हे गृहस्थ जीवनाचे पहिले यशस्वी पाऊल आहे. पण दुर्दैवाने इंद्रियतृप्तीच्या हव्यासापोटी आणि केवळ दुसऱयाच्याकडे जे काही आहे ते गरज असो वा नसो आपल्याकडे असावे म्हणून गैरमार्गाने धन कमविण्याच्या मागे लोक लागलेले आपल्याला आढळून येतात. पण हे फार मोठे दुष्परिणामही पाठीमागून घेऊन येतात हे लोभी व्यक्ती विसरून जाते. श्रीमद भागवतमध्ये वर्णन येते (भा 7.13.32) पश्यामि धनिनां क्लेशं
लुब्धानामजितात्मनाम्।भयादलब्धनिद्राणां सर्वतो।़भिविशङ्किनाम् । अर्थात ‘आपल्या इंद्रियांना वशीभूत असणाऱया धनी व्यक्तींना धनसंचय करण्याचा खूप लोभ असतो. संपत्ती, ऐश्वर्य असतानादेखील सर्वबाजूनी भयाने ग्रासल्यामुळे ते अनिदेचे शिकार ठरतात. लोभी व्यक्तीचे धन त्याला नीट झोपूही देत नाही. मानसिक तणावाखाली प्रत्येकक्षणी त्याला वावरावे लागते. अशा व्यक्तीला आनंद तर मिळतच नाही उलट दुःखच भोगावे लागते आणि अशा दुःखातून बाहेर पडण्यासाठी त्याला मांस, मदिरा, मैथुन, जुगार या व्यसनांचा नाद लागतो, कालांतराने अशा जीवनालाच तो मनुष्य जीवनाचे ध्येय मानू लागतो. त्यातून जीवनामध्ये आणखी समस्या निर्माण होतात. पुढील श्लोकात त्याचे वर्णन येते. (भा7.13.33) राजतश्चौरतः शत्रोः स्वजनात्पशुपक्षितः।अर्थिभ्यः कालतः स्वस्मान्नित्यं प्राणार्थवद्भ³ाम् । अर्थात ‘भौतिकदृष्टय़ा ज्यांना शक्तीशाली आणि श्रीमंत मानले जाते त्या व्यक्ती सरकारी नियम, चोर डाकू, शत्रू, स्वजन, पशु, पक्षी, दान मागणारे, काळ एवढेच काय स्वतःमुळेही चिंताग्रस्त असतात. अशा तऱहेने ते अनिवार्य रीतीने भयभीत असतात’ अशाप्रकारे आपल्या सर्व मानसिक विकारामध्ये गुंतल्याने थोडीशीही दुःखातून मुक्तता म्हणजे त्याला सुख वाटू लागते. आणि या तथाकथित सुखाच्या भ्रमात व्यक्ती परमगती अर्थात ‘उच्च विचारसरणी’ पूर्णपणे विसरून जातो. म्हणून बुद्धिमान व्यक्तीने सुरुवातीपासूनच कसे वागावे याचे मार्गदर्शन करताना सांगितले आहे (भा7.13.34)शोकमोहभयक्रोधरागक्लैब्यश्रमादयः । यन्मूलाः स्युर्नणां जह्यात्स्पृहां प्राणार्थयोर्बुधः। अर्थात ‘मानव समाजातील बुद्धिमान व्यक्तींनी शोक, लोभ, भय, क्रोध, अनुराग, दरिद्रय़ता आणि अनावश्यक धनाच्या मूळ कारणाचा त्याग करावा. या सर्वांचे मूळ कारण आहे अनावश्यक प्रति÷ा व धनाची लालसा.’ यासाठी बुद्धिमान व्यक्तीने धन आणि प्रति÷ा याला जीवनाचे ध्येय न मानता साधन म्हणून स्वीकार करावा हीच ‘साधी राहणी’ आहे. म्हणून ज्या व्यक्तींना या अभंगात ‘उत्तमची गती’ ज्याला म्हटले आहे ती ‘उच्च विचारसरणी’ म्हणजे भगवद्भक्ती प्राप्त करावयाची असेल तर त्यांनी दृढनिश्चयाने, प्रामाणिकपणे, अधार्मिक मार्गाने धनार्जन करण्याचे थांबवणे श्रेयस्कर आहे.
ज्याप्रमाणे धन अधार्मिक मार्गाने मिळविणे हे आपल्या ‘उच्च विचारसरणी’ला म्हणजे भगवद्भक्तीला घातक आहे, त्याचप्रमाणे मिळविलेले धन अधार्मिक कार्यांसाठी खर्च करणेही तितकेच घातक आहे. म्हणून ‘उदास’ आणि ‘अनासक्त’
भावनेने म्हणजे सत्कार्यासाठी ज्यामध्ये सर्व जीवांचे कल्याण होईल अशा कार्यासाठी धन म्हणजे लक्ष्मी, तिचा निवास हा कायमचा भगवान नारायणाच्या चरणी असतो हे प्रत्यकाने ध्यानात ठेवून उपयोग करणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर आपण समाजाचा घटक असल्याने समाजाचेही काही देणे लागतो ही भावना मनामध्ये कायम असणे म्हणजे आपल्या कोणत्याही कृतीने कोणाच्याही मनाला, शरीराला, आणि भावनेला दुःख होऊ न देणे महत्त्वाचे आहे. स्वतःला श्रे÷ किंवा परिपूर्ण व्यक्तिमत्व सिद्ध करण्याच्या नादात आपण दुसऱयांशी तुलना करतो आणि त्यातून निंदा करणे हा स्वभाव जन्माला येतो. प्रत्येक जण भगवंतांना प्रिय आहे हे जाणणे यासाठी महत्त्वाचे आहे. परस्त्री मातेसमान मानणे, गायीला माता मानले आहे म्हणून तिचे पालन करणे इत्यादी सामाजिक, धार्मिक कर्तव्यांबद्दल जागरूक असणे ही ‘उच्च विचारसरणी’ मानली जाते.
-वृंदावनदास