लाखो रुपयांची हानी, पाच अग्निशामकाच्या मदतीने आग आटोक्यात
प्रतिनिधी/ सातारा
वाढे फाटा येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास टायर शॉपला आग लागली. त्यानंतर आजूबाजूच्या दुकानांनी पेट घेतला. बघता बघता तब्बल सहा दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. अग्निशामक दलाच्या पाच गाडय़ांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी सकाळी सात वाजेपर्यत शर्थीचे प्रयत्न सुरु होते. लाखो रुपयांची हानी झाली. आग कशामुळे लागली हे मात्र समजू शकले नाही. महसूल विभागाकडून पंचनामे करण्याचे काम सुरु होते.
वाढे फाटा येथे मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास एका वाहनधारकास आग लागल्याचे निदर्शनास येताच त्याने आग आग अशी आरोळी ठोकत तेथील स्थानिकांना जागे केले. स्थानिकांची झोपेत पळापळ सुरु झाली. आग लागल्याचे पाहून कोणी बादल्या, हंडे घेऊन आग आटोक्यात आणण्यासाठी धावू लागले. एका टायरच्या दुकानाला सुरुवातीला आगीने घेरले होते. त्यालगतच असलेले दुसरे टायरचे दुकान आगीने गिळपृंत केले. त्यापाठोपाठ टीव्ही, फ्रिजचे दुकान, चहाचे दुकान, बिर्याणी हाऊस, चप्पलचे दुकान अशी सहा दुकानांना चांगलीच आग लागली. कोणीतरी 101 ला फोन केला. सातारा पालिकेचे अग्निशामन अधिकारी माने यांनी लगेच अग्निशामक दलाचा बंब घटनास्थळी पाठवला. परंतु आगीचे रौद्र रुप पाहून एकटय़ा पालिकेच्या बंबावर ही आग आटोक्यात येणार नसल्याचे पाहताच त्यांनी शेंद्रे येथील अजिंक्यतारा सहकारी साखर कारखाना, भुई&ज येथील किसन वीर सहकारी साखर कारखाना, कूपर फौंड्री आणि वाई नगरपालिका यांचा अग्निशामक दलाचा बंब बोलवला होता. पाच बंबाच्या सहाय्याने पाणी मारुन आग आटोक्यात आणण्याचे काम सकाळी 7 वाजेपर्यंत सुरु होते. रात्री अडीच वाजता लागलेली आग ही तब्बल पाच तास आटोक्यात आणण्याचे काम सुरु होते. या आगीत लाखो रुपयांची हानी झाली आहे.