कचऱ्याची विल्हेवाट लावण्याकडे ग्राम पंचायतीचे दुर्लक्ष
वार्ताहर /कडोली
येथील बसवाण्णानगरजवळ भर रस्त्यावर दुर्गंधीयुक्त कचऱ्याने नागरिक त्रस्त झाले असून ग्राम पंचायत याकडे लक्ष देणार काय? असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. कचऱ्याची समस्या आज सर्वत्र पाहावयास मिळत आहे. काही अज्ञात लोक आपला कचरा रस्त्याकडेला टाकून मोकळे होतात. अनेक ठिकाणी रस्त्याकडेला कचऱ्याच्या भरलेल्या पिशव्या दिसून येत असतात. अशा कचऱ्यामध्ये मृत कुत्री, लहान जनावरांची पिले टाकून मोकळे होतात. पण याचा त्रास मात्र नागरिकांना सोसावा लागतो. असाच एक प्रकार बसवाण्णानगर कडोली येथील रस्त्यावर घडल्याने नागरिकांत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. रस्त्याकडेला टाकण्यात आलेल्या कचऱ्याच्या ढिगामध्ये अज्ञात व्यक्तीने मृत जनावराचे पिल्लू टाकले होते. त्या मृत पिल्लाला भटक्या कुत्र्यांनी ओढून आणून भर रस्त्यावर पंचनामा केला होता. शिवाय याचबरोबर मोठ्याप्रमाणात कचऱ्याच्या पिशव्या व कचरा इतरत्र विस्कटून टाकला होता. येथे निर्माण झालेल्या दुर्गंधीने तेथील नागरिक आणि ये-जा करणारे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या दुर्गंधीयुक्त कचऱ्याची विल्हेवाट मात्र लावण्यात आली नाही. या प्रकाराकडे ग्राम पंचायतीने साफ दुर्लक्ष केल्याने नागरिकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत. गाव हद्दीत रस्त्याकडेला कचरा टाकण्यास मज्जाव करावा, जेणेकरून अशाप्रकारचे दुर्गंधीयुक्त परिसर निर्माण होणार नाही. कचऱ्याचीं ने-आण करण्यासाठी शासनाने ग्राम पंचायतीला वाहन उपलब्ध करून दिले आहे. या वाहनाचा वापर कधी होणार? की शोभेची वस्तू म्हणून ग्राम पंचायतीसमोर उभी राहणार, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. दोन मजूर लावून या कचऱ्याची विल्हेवाट लावणे गरजेचे होते. पण ग्राम पंचायतीने तसे न केल्याने नागरिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.