डब्ल्यूटीसी फायनल कसोटी, दुसरा दिवस : ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात 469 धावा, भारत 5 बाद 151, जडेजा 48, रहाणे नाबाद 29
वृत्तसंस्था /लंडन
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल कसोटीच्या दुसऱ्या दिवशी उपाहारानंतरच्या सत्रात भारताने ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव 469 धावांत गुंडाळला. सिराजने 4 बळी मिळविले. त्यानंतर दिवसअखेर भारताने 38 षटकांत 5 बाद 151 धावा जमविल्या. रहाणे 29 व श्रीकर भरत 5 धावांवर खेळत होते. 3 बाद 327 अशा भक्कम स्थितीत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. ट्रॅव्हिस हेड व स्टीव्ह स्मिथ ही कालची नाबाद जोडी स्वच्छ सूर्यप्रकाशात मैदानात उतरली. 95 धावांवर खेळणाऱ्या स्मिथला सिराजकडून दोन आयते चेंडू मिळाले, ज्यावर स्मिथने आनंदाने सलग दोन चौकार ठोकत इंग्लंडमधील सातवे आणि या मैदानावरील तिसरे शतक पूर्ण केले. भारताने पहिल्या दिवशी सुरुवातीला उसळत्या चेंडूंचा वापर न करण्याची चूक केली. पण दुसऱ्या दिवशी सिराजने त्याचा सढळ वापर केला. शमीनेही अधूनमधून बाऊन्सर टाकण्याचा प्रयत्न केला. पण सिराजला खेळपट्टीने जशी साथ दिली तशी शमीला मिळाली नाही. या डावपेचाची स्मिथला चिंता वाटली नाही. पण हेड काहीसा विचलित झाला होता.
दिवसातील सहाव्या षटकात सिराजने हेडच्या शरीराच्या दिशेने शॉर्ट चेंडू टाकला. हेडने यष्टी सोडून बाजूला येत चेंडू पुल केला. पण चेंडूने बॅटची कड घेतली आणि यष्टिरक्षक भरतने हा झेल आरामात टिपला. हेडने 174 चेंडूत 25 चौकार, 1 षटकारासह 163 धावा फटकावल्या आणि स्मिथसह चौथ्या गड्यासाठी 285 धावांची विक्रमी भागीदारी केली. नंतर कॅमेरॉन ग्रीनही फार वेळ टिकला नाही. शमीच्या चेंडूवर ड्राईव्ह करताना तो स्लिपमध्ये गिलकरवी झेलबाद झाला. त्याने 7 चेंडूत 6 धावा काढल्या. स्मिथची प्राईज विकेट शार्दुल ठाकुरला मिळाली. स्मिथने त्याला फटकावण्याच्या प्रयत्नात चेंडू यष्ट्यांवर ओढवून घेतला. शार्दुलचा हा दिवसातील पहिलाच चेंडू होता. स्मिथने 268 चेंडूत 19 चौकारांच्या मदतीने 121 धावा काढल्या.
बदली खेळाडू अक्षर पटेलच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे भारताला सकाळच्या सत्रातील चौथा बळी मिळाला. त्याच्या थेट फेकीवर मिचेल स्टार्क धावचीत झाला. उपाहाराला खेळ थांबला तेव्हा अॅलेक्स कॅरे 22 व कमिन्स 2 धावांवर खेळत होते. उपाहारानंतरच्या सत्रातही भारतीय गोलंदाजांनी वर्चस्व कायम राखत त्यांचा पहिला डाव 469 धावांवर संपुष्टात आणला. अॅलेक्स कॅरेने फटकेबाजी करीत 69 चेंडूत 7 चौकार, 1 षटकाराच्या मदतीने 48 धावा फटकावल्या तर कमिन्स 9, लियॉन 9 धावा काढून बाद झाले. बोलँड 1 धावेवर नाबाद राहिला. मोहम्मद सिरज भारताचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 108 धावांत 4 बळी मिळविले तर शमी व शार्दुल यांनी प्रत्येकी 2 व जडेजाने कॅरेचा एकमेव बळी मिळविला.
भारताची खराब सुरुवात
रोहित शर्मा व शुभमन गिल यांनी भारतीय डावाला सावध सुरुवात केली. पण ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर भारताची स्थिती लवकरच 4 बाद 71 अशी झाली. रोहितला कमिन्सने पायचीत करीत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर गिल बोलँडचा चेंडू सोडून देण्याच्या प्रयत्नात त्रिफळाचीत झाला आणि पुजाराला ग्रीनने 14 धावांवर त्रिफळाचीत केल्यानंतर भारताची स्थिती चौदाव्या षटकात 3 बाद 50 अशी झाली. कोहलीकडून दीर्घ खेळीची अपेक्षा केली जात होती. पण एका एका उसळत्या चेंडूवर कोहली स्लिपमध्ये 14 धावांवर झेलबाद झाला. रहाणे व जडेजा यांनी थोडाफार डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी 71 धावांची भागीदारी केली. लियॉनने ही जोडी फोडताना जडेजाला झेलबाद केले. त्याने 51 चेंडूत 7 चौकार, 1 षटकारासह 48 धावा फटकावल्या. रहाणे व केएस भरत यांनी आणखी पडझड होऊ न देता उर्वरित वेळ खेळून काढला. खेळ थांबला तेव्हा भारताने 5 बाद 151 धावा जमविल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या सर्वच गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करीत भारतीय फलंदाजांची परीक्षा घेतली. रहाणेने 71 चेंडूत 4 चौकारांसह 29 धावांवर नाबाद राहिला. स्टार्क, कमिन्स, बोलँड, ग्रीन, लियॉन यांनी एकेक बळी मिळविले.
संक्षिप्त धावफलक
ऑस्ट्रेलिया प.डाव : 121.3 षटकांत सर्व बाद 469 : वॉर्नर 43 (60 चेंडूत 8 चौकार), उस्मान ख्वाजा 0, लाबुशेन 26 (62 चेंडूत 3 चौकार), स्मिथ 121 (268 चेंडूत 19 चौकार), हेड 163 (174 चेंडूत 25 चौकार, 1 षटकार), ग्रीन 6, कॅरे 48 (69 चेंडूत 7 चौकार, 1 षटकार), स्टार्क 5, कमिन्स 9,लियॉन 9, बोलँड नाबाद 1, अवांतर 38. गोलंदाजी : शमी 2-122, सिराज 4-108, ठाकुर 2-83, उमेश यादव 0-7, जडेजा 1-56.
भारत प.डाव 38 षटकांत 5 बाद 151 : रोहित 26 चेंडूत 15, गिल 15 चेंडूत 13, पुजारा 25 चेंडूत 14, कोहली 31 चेंडूत 14, रहाणे खेळत आहे 29, जडेजा 51 चेंडूत 48, भरत खेळत आहे 5, अवांतर 13. गोलंदाजी : स्टार्क, कमिन्स, बोलँड, ग्रीन, लियॉन प्रत्येकी 1 बळी.