आरपीडी कॉलेजमध्ये ‘माती वाचवा’बाबत व्याख्यान : मातीचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रयत्न गरजेचे
प्रतिनिधी / बेळगाव
एसकेई सोसायटी संचालित आरपीडी पीयू कॉलेजतर्फे गुरुवारी ‘माती वाचवा’ या विषयावर व्याख्यान झाले. यावेळी नथिला यांनी ‘मातीचे संवर्धन’ याविषयी सविस्तर माहिती दिली. व्यासपीठावर संस्थेचे व्हाईस चेअरमन एस. वाय. प्रभू, प्राचार्य काशिनाथ मेल्लेद, ईशा फाऊंडेशनच्या अमृता अमृतकर उपस्थित होते.
नथिला यांनी फ्रान्स ते भारत असा सायकल प्रवास केला आहे. दरम्यान, या प्रवासात ‘माती वाचवा’बाबत त्यांनी संदेश दिला आहे. यावेळी नथिला म्हणाल्या, मातीविषयी जागरुकता निर्माण करून मातीचा ऱ्हास कमी करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करणे आवश्यक आहे. शिवाय मातीला नैसर्गिक वातावरण दिल्यास माती शक्तिशाली बनेल.
पाऊस, वारा, पाणी यामुळे माती वाहत जाऊन कस कमी होत आहे. त्यामुळे माती धोक्यात येत आहे. अशा परिस्थितीत पुनरुज्जीवन करून मातीचा ऱ्हास रोखण्यासाठी संवर्धन गरजेचे आहे. मातीचे आरोग्य चांगले राहिल्यास मनुष्याचे आरोग्य चांगले राहील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.