श्रीपुर (प्रतिनिधी) विनायक बागडे
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा येत्या 18 जूनपासून 23 जूनपर्यंत सातारा जिल्ह्यातून मार्गस्थ होणार असून या कालावधीत जिल्हा प्रशासनाने वारकरी व भाविकांना आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रशासनास दिले. महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लोणंद पालखी तळ व फलटण पालखी तळाची वारीच्या तयारीच्या दृष्टीने पाहणी केली. त्यावेळी ते बोलत होते.
भाविकांना पालखी सोहळ्याच्या कालावधीत कुठलाही त्रास होणार नाही याची जिल्हा प्रशासनाने काळजी घ्यावी.पालखी सोहळ्याच्या ठिकाणची पाहणी केली असता सोहळ्याचे नियोजन जवळपास पूर्ण होत आलेले आहे. लोणंद पालखी तळावरील विद्युतवाहक तारांमुळे वारकरी व भाविकांना त्रास होणार नाही यासाठी या विद्युतवाहक तारा पालखी तळापासून दूर उभाराव्यात,अशा सूचनाही विखे पाटील यांनी यावेळी दिल्या. लोणंद पालखीतळ येथे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.