जीवितहानी झाल्यावरच प्रशासनाला जाग येणार का?
अक्कलकोट प्रतिनिधी
अक्कलकोट तालुक्यातील वागदरी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे छत कोसळल्याची घटना शनिवारी घडली आहे. छत कोसळलेल्या खोलीमध्ये पहिलीच्या वर्गातील मुले बसत होती. मात्र शाळा भरण्यापूर्वी छत कोसळल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. घटना घडल्यानंतर संतप्त पालकांनी जीर्ण वर्गखोल्या बद्दल चिंता व्यक्त केली आहे.
काही दिवसांपूर्वी पालकांनी व शाळेने या शाळेच्या खोलीच्या दुरवस्थेबाबत प्रशासनाला माहिती देत कळवले होते. मात्र, झोपलेल्या प्रशासनाला अजून जाग आलेली नाही. सकाळची शाळा असल्याने मुले आज लवकर शाळेत आली होती. छत कोसळण्याची घटना रात्री किंवा पहाटे झाली. अन्यथा आज याठिकाणी मोठ्या दुर्घटनेला सामोरे जावे लागले असते.
जे शाळेचे छत कोसळले त्या खोलीत पहिलीचा वर्ग बसत होता आणि ३४ चिमुकले विद्यार्थी शिक्षण घेत होते. शाळा भरण्या अगोदर ही दुर्घटना झाली त्यामुळे लहान मुलांच्या जीवावरचा धोका टळला.
वारंवार शाळेमार्फत दुरुस्तीसाठी प्रस्ताव पाठविला जात असला तरी प्रत्यक्षात त्याची त्वरीत अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र आहे. त्या छताची दुरूस्ती करण्याची गरज जिल्हा परिषदेला वाटली नाही का? पंचायत समितीने त्याचे गांभीर्य शिक्षण विभागाला सांगितले नाही का? असे अनेक प्रश्न या निमित्ताने पालक वर्गातून आता विचारले जात आहेत. घटनास्थळी जि. प. सदस्य आनंद तानवडे यांनी भेट दिले. याच बरोबर ग्रामसेवक शाळा व्यवस्थापन समिती तसेच सरपंच यांनी पंचनामा करून वर्ग खोलीच्या दुरवस्था बद्दल वरिष्ठांना माहिती पाठवली.