मुंबईतील मिरा रोड परिसरात झालेल्या बाबा बागेश्वर अर्थात धिरेंद्र शास्त्री यांच्या कार्यक्रमाला महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी विरोध केला होता. विधानभवनाच्या परिसरात आज आमदार अमोल मिटकरी यांनी धिरेंद्र शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल करून पाखंडी बाबा म्हणून संबोधले. तसेच महाराष्ट्रातील गरिबी धिरेंद्र शास्त्रींनी आपल्या शक्तीने घालवून दाखवावी असे आवाहन त्यांनी केले.
विधानभवनाबाहेर बोलताना राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “बागेश्वर बाबाची दहा पिढी जरी खाली आली तरी ते भारताला हिंदुराष्ट्र करू शकत नाही. बागेश्वर महाराज ज्या श्रीकृष्णाचे नाव घेतात, त्या भगवान श्रीकृष्णांनी सुद्धा महाभारतात हा देश भारत असल्याचे सांगितले आहे….संविधानात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनीसुद्धा भारत हेच नाव ठेवले आहे…त्यामुळे हा भारतच राष्ट्र आहे आणि इथून पुढेही राहील.महाराष्ट्रात अंधश्रद्धेविरोधात एक कायदा आहे. महाराष्ट्र संतांची भुमी आहे. तुकाराम महाराज आणि गाडगेबाबांची भुमी आहे.” असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना ते म्हणाले, “बागेश्वर बाबाने महाराष्ट्राच्या विरोधात घाणेरडी भाषा वापरली आहे. त्याचा कार्यक्रम महाराष्ट्रात होतोच कसा? ज्यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे त्यांच्यावर सुद्धा कारवाई केली पाहीजे. असल्या बाबाला महाराष्ट्रात आणून काय साध्य केले गेले. हा बाबा सत्संगी नसून कुसंगी आहे…पाखंडी आहे. देशात निम्मे लोक भुकेले झोपतात बागेश्वर महाराजाकडे एव्हढी शक्ती असेल तर त्यांनी महाराष्ट्रातील आणि देशातील गरिबी दूर करावी असे आवाहन आमदार अमोल मिटकरी यांनी केले.