नवी दिल्ली / वृत्तसंस्था
गुजरातमध्ये 2002 मध्ये झालेल्या धार्मिक दंगलींमध्ये बलात्कार पिडीत असलेली महिला बिल्कीस बानो यांच्या याचिकेवर निर्णय देण्यासाठी विशेष पीठ स्थापन करण्यात येईल, अशी घोषणा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी केली आहे. बुधवारी या याचिकेवर प्रारंभिक सुनावणी करण्यात आली.
ही याचिका बराच काळपासून प्रलंबित आहे. तथापि, आजवर सुनावणी केव्हा होणार हे स्पष्ट करण्यात आलेले नाही, असा आक्षेप बानो यांच्या वकील शोभा गुप्ता यांनी नोंदविला. त्यावर सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी लवकरच विशेष पीठ स्थापन करण्याचे आश्वासन दिले. बिल्कीस बानो प्रकरणात 11 जणांना जन्मठेपेची शिक्षा देण्यात आली होती. तथापि, नंतर काही वर्षांनी सर्व आरोपींची कारागृहातून सुटका करण्यात आली होती. गुजरात सरकारच्या धोरणानुसार हा निर्णय घेण्यात आला होता. बानो यांनी सुटका करण्याच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी बानो यांच्या याचिकेवर विचार करण्यासाठी दोन न्यायाधीशांच्या पीठाची स्थापन केली होती. तथापि, या पीठातील एक न्यायाधीश बेला त्रिवेदी यांनी आपले अंग काढून घेतले होते.
त्यामुळे आता नवे पीठ स्थापन करावे लागणार आहे. या प्रकरणात बानो यांच्यासह मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेत्या सुभाषिनी अली यांनीही याचिका सादर केली आहे. तसेच तृणमूल काँगेंस नेत्या महुआ मोईत्रा यांनीही याचिका सादर केली आहे. तसेच अन्य काही जणही न्यायालयात पोहचले आहेत.