पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते अनावरण, जागतिक भरड धान्य परिषदेसही प्रारंभ
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते भरड धान्यावर एका पोस्ट तिकिटाचे आणि एका नाण्याचे अनावरण करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य परिषदेचा प्रारंभही येथे शनिवारपासून झाला आहे. त्या निमित्ताने हे पोस्ट तिकीट आणि नाणे काढण्यात आले आहे. भरड धान्यांचे उत्पादन वाढावे आणि मानवाच्या आहारात या धान्यांचा समावेश मोठय़ा प्रमाणात व्हावा, यासाठी केंद्र सरकारने पुढाकार घेतला असून जगातही आज या धान्यांवर नव्याने विचार सुरु झाला आहे.
पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते शनिवारी आंतरराष्ट्रीय भरड धान्य परिषदेचेही उद्घाटन करण्यात आले. अशा प्रकारची ही प्रथमच परिषद आहे असे बोलले जात आहे. या परिषदेत 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी भाग घेत आहेत. भरड धान्यांचे अर्थशास्त्र आणि त्यांच्यापासून पर्यावरणाचे होणारे संवर्धन, तसेच त्यांची मानवाची भूक भागविण्यासाठी असणारी आवश्यकता यांच्यावर या परिषदेत विचार केला जाणार आहे. जगभरात अशा धान्यांचे उत्पादन वाढविण्यासाठी आज नव्याने प्रयत्न होत आहेत. त्यांचाही आढावा या परिषदेत घेतला जाणार आहे.
2023 हे भरड धान्य वर्ष
भरड धान्यासंबंधी जनजागृती करण्यासाठी पंतप्रधान मोदी कार्यरत आहेत. 2023 हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून मानले जावे अशी सूचना त्यांनी केली होती. त्यांच्याच पुढाकाराने हे वर्ष भरड धान्य वर्ष म्हणून ओळखण्यात आले आहे. भारताने आपल्या भूमीवर या संबंधातील पहिल्या वहिल्या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करुन एक सकारात्मक पायंडा पाडला असल्याची चर्चा आहे.
100 हून जास्त देशांचा सहभाग
दोन दिवस चालणाऱया या परिषदेशासाठीं जगातील 100 हून अधिक देशांचे प्रतिनिधी भारतात आलेले आहेत. 2023 मध्येच भारताला जी-20 परिषदेचे अध्यक्षस्थान मिळाले आहे. या परिषदेचा संबंध जी-20 शी नसला तरी जी-20 परिषदेच्या सदस्य देशांसाठीही भरड धान्यांचा विषय महत्वाचा आहे. परिणामी, या विषयातील पहिल्या परिषदेचा मान भारताला मिळणे महत्वाचे मानले गेले आहे.
भारताला मोठी सुसंधी
भरड धान्यांचा उपयोग आहारात मोठय़ा प्रमाणावर केला जावा यासाठी भारत प्रयत्नशील आहे. देशात तसेच परदेशात यासाठी समाजाचे मोठे प्रबोधन करण्याची आवश्यकता आहे. भारत त्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न करीत आहे. भरड धान्यांमुळे कृषी नियोजनातील असमतोल दूर होण्याची शक्यता आहे. तसेच छोटय़ा आणि अत्यल्प भूधारक शेतकऱयांसाठीही ही बाब महत्वाची आहे.
कमी पावसातील पिके
भरड धान्ये ही कमी पावसाच्या आणि कमी प्रतीच्या मातीच्या प्रदेशांमध्येही उगवू शकतात. त्यामुळे त्यांचा उत्पादन खर्च कमी आहे. मात्र, भरड धान्यांमधील पोषक द्रव्यांचे प्रमाण लक्षणीय असते तसेच ती पचावयास हलकी असतात. परिणामी, सर्वसामान्य किंवा गरीबांना भरपूर अन्न उपलब्ध व्हावे यासाठी या धान्यांचा चांगला उपयोग केला जाऊ शकतो. म्हणूनच त्यांना प्राधान्य मिळत आहे.
क्षमता दाखविणार
भरड धान्यांची बहुविधता आणि उत्पादन भारतात मोठय़ा प्रमाणावर आहे. ही धान्ये भविष्यकाळाचे प्रमुख अन्नस्रोत आहेत. भारत या परिषदेत आपली ही उत्पादन क्षमता जगाला दाखविणार आहे. ही संधी भारताला या परिषदेमुळे मिळणार आहे. भारतात पिकणाऱया भरड धान्यांनां जगाच्या बाजारात स्थान मिळाले तर भारताच्या शेतकऱयालाही ते लाभदायक ठरणार आहे. परिणामी अधिकाधिक शेतकरी या धान्यांच्या उत्पादनाकडे वळतील अशी शक्यता आहे. पारंपरिक धान्यांपेक्षा ही धान्ये अधिक वेगाने लोकप्रिय होण्याची शक्यता आहे.