निवडीची आज औपचारिकता : भाजपकडून बिनविरोधाची साद : आघाडीकडून पठाण, पाटील यांचे अर्ज.
प्रतिनिधी/सांगली
मनपाच्या स्थायी समिती सभापती पदी मंगळवारी भाजपकडून धीरज सूर्यवंशी तर काँगेस-राष्ट्रवादी आघाडीकडून संतोष पाटील व फिरोज पठाण यांचे अर्ज दाखल झाले आहेत. संख्याबळ पाहता सूर्यवंशी यांचा विजय निश्चित मानला जात आहे. समितीमध्ये भाजपचे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे संघर्ष टाळायचा प्रयत्न करु. आघाडीकडे बिनविरोधासाठी विनंती करु अशी माहिती भाजपाचे शहरजिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर यांनी दिली.
महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभापती निवडीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतीम मुदत होती. बुधवारी निवड होणार आहे. जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. समितीमध्ये भाजपचे सर्वाधिक 9, काँगेस 4 तर राष्ट्रवादीचे 3 असे 16 सदस्य आहेत. गेल्या चार वर्षापासून समितीवर भाजपचेच वर्चस्व आहे. त्यामुळे भाजपमध्ये इच्छुकांची संख्या वाढली होती. माजी उपमहापौर धीरज सूर्यवंशी, ऍड. स्वाती शिंदे, गजानन आलदर यांच्यामध्ये चुरस निर्माण झाली होती. अखेर धीरज सूर्यवंशी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. सूर्यवंशी यांनी मंगळवारी सकाळी अर्ज दाखल केला.
आमदार सुधीर गाडगीळ, शहरजिल्हाध्यक्ष दीपक शिंदे-म्हैसाळकर, सभागृहनेते विनायक सिंहासने, पाडूरंग कोरे, माजी महापौर गीता सुतार यांच्यासह भाजपचे सर्व नगरसेवक, नगरसेविका यावेळी उपस्थित होत्या. शहरजिल्हाध्यक्ष शिंदे म्हणाले, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सूर्यवंशी यांचे नाव अंतीम केले. स्थायीतील सर्व सदस्यांनीही सूर्यवंशी यांच्या नावाला पाठिंबा दिला. त्यांचा अर्ज भरला आहे. समितीत भाजपची ताकद आहे. त्यामुळे सूर्यवंशी सभापती होतील यामध्ये कोणतीही शंका नाही.
दुसरीकडे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीकडून काँगेसचे संतोष पाटील व फिरोज पठाण यांचे अर्ज दाखल करण्यात आले. विरोधीपक्ष नेते संजय मेंढे, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान, अमर निंबाळकर आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे अर्ज दाखल करणारे पाटील व पठाण वगळता काँग्रेस-राष्ट्रवादीचे स्थायी समितीमधील एकही सदस्य यावेळी उपस्थित नव्हता. अन्य नगरसेवकही अनुपस्थित होते. याशिवाय दोन्ही पक्षाचे शहर जिल्हाध्यक्षही उपस्थित नव्हते. त्यामुळे आघाडीचा उमेदवार लढणार की माघार घेणार याबाब उत्सुकता निर्माण झाली आहे.
शंभर कोटीपेक्षा अधिक निधी आणणार
स्थायी समितीत भाजपची ताकद आहे. त्यामुळे सूर्यवंशी यांचा विजय निश्चित आहे. राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आहे. गतवेळी फडणवीस यांनी शंभर कोटींचा निधी दिला होता. यावेळी त्याहीपेक्षा अधिकच निधी मिळेल. महापालिका, कामगार मंत्री डॉ. सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ यांच्या माध्यमातून तिन्ही शहरांचा समतोल विकास करु. त्यामुळे येणाऱया निवडणुकीत जनता महापालिका पुन्हा भाजपच्याच ताब्यात देईल यात शंका नाही.
दीपक शिंदे-म्हैसाळकर, जिल्हाध्यक्ष, भाजपा.