मंत्री उदय सामंत यांच्याकडे मागणी
बेळगाव : सीमावासियांसाठी ऑनलाईन मदत केंद्र सुरू करण्याची मागणी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मंत्री उदय सामंत यांच्याकडे केली. नुकतीच कार्यकर्त्यांनी रत्नागिरी येथे मंत्र्यांची भेट घेऊन सीमावासियांच्या व्यथा त्यांच्यासमोर मांडल्या. बेळगावमध्ये भाषाभेद वाढला असून संस्कृतीवर घाला घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मराठी माणसांची गळचेपी तर होतच आहे. त्याचबरोबर शिवाजी महाराजांचा अवमानदेखील अनेकवेळा झाला आहे. चार महिन्यांपूर्वी सीमावादावर गृहमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. या बैठकीत दोन्ही राज्यांचे तीन-तीन आयएएस अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, त्यापुढील प्रक्रिया काय, याबाबत सीमावासियांना माहिती नाही. महाराष्ट्र सरकारने समाविष्ट केलेल्या आयएएस अधिकाऱ्यांपर्यंत तक्रारी पोहोचण्यासाठी सीमावासियांकरिता ऑनलाईन तक्रार केंद्र सुरू करावे, अशी मागणी यावेळी सामंत यांच्याकडे करण्यात आली. यावेळी सूरज कणबरकर, उदय कलघटकर, आनंद पाटील, महेश सावी यांसह इतर उपस्थित होते.