नूतन आमदारांनी समस्येची घेतली दखल : कामाला सुरुवात केल्याने कंग्राळी बुद्रुकमधील शेतकरीवर्ग-नागरिकांतून समाधान
वार्ताहर /कंग्राळी बुद्रुक
शाहूनगर, आझमनगरसह इतर भागातील सांडपाणी कंग्राळी बुद्रुक हद्दीतून वाहत असलेल्या व तुंबलेल्या गटारी त्वरित साफ करण्याचा आदेश उत्तरचे आमदार राजू सेठ यांनी दिला. त्यामुळे जेसीबीने गटारींच्या स्वच्छतेलाही सुरुवात केल्यामुळे शेतकरीवर्ग व नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. शाहूनगर हे मनपाचे उपनगर असून कंग्राळी बुद्रुक गावाच्या हाकेच्या अंतरावर आहे. शाहूनगर वसाहत तयार झाल्यावर फक्त शाहूनगरचे सांडपाणी तेव्हढेच कंग्राळी बुद्रुक हद्दीमध्ये येत होते. तसेच पूर्वी आझमनगर, नेहरुनगर वसाहतींचे सांडपाणी बॉक्साईट रस्त्याच्या बाजूने आझमनगरमधून कंग्राळी खुर्द हद्दीतून नाल्याद्वारे मार्कंडेय नदीला मिळत होते. परंतु 15 ते 20 वर्षापूर्वी महानगरपालिकेने बॉक्साईट रस्ता फोडून कंग्राळी खुर्दकडून आझमनगर, नेहरुनगर वसाहतींचे सांडपाणी शाहूनगर वसाहत गटारीमार्गे कंग्राळी बुद्रुक हद्दीमधून शेतकऱ्यांनी तयार केलेल्या कच्च्या गटारीतून नाल्याद्वारे मार्कंडेय नदीला सोडले. यावेळी कंग्राळी बुद्रुक येथील शेतकरीवर्गाने महानगरपालिकेचे सांडपाणी आमच्या हद्दीमध्ये सोडू नका म्हणून विरोध केला. याबद्दल ‘तरुण भारत’ वृत्तपत्रामध्ये अनेकवेळा वृत्तांकन करण्यात आले. परंतु तुघलकी शासकीय महानगरपालिकेने सांडपाणी कंग्राळी बुद्रुकमधील सुपीक शिवारामध्ये सोडून जमिनीचा पोत खराब करण्याचे काम केले. यामुळे थोडासा जरी पाऊस झाला तरी सर्व पाणी शिवारामध्ये पसरत होते. यामुळे रस्त्याला लागून असलेल्या जमिनीत शेतकऱ्यांनी दोन्ही बाजूने स्वत:च कच्ची गटार तयार केली आणि सांडपाण्याचा निचरा केला. आता सांडपाणी गटारीतून वाहत आहे.
अन् आमदार राजू सेठनी तातडीने लक्ष घातले
कंग्राळी बुद्रुक ग्रा. पं. च्या शिष्टमंडळाने बेळगाव उत्तरचे आमदार राजू सेठ यांची नुकतीच भेट घेऊन त्यांना शाहूनगर, आझमनगर, नेहरुनगर, केएलई हॉस्पिटल, वैभवनगर आदी महानगरपालिकेच्या हद्दीतील सांडपाणी कंग्राळी बुद्रुक हद्दीतील शिवारातून कसे वाहते, सध्या आम्हालाही पाणी अडवणे शक्य नाही. कच्च्या गटारी असल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे कसे नुकसान होत आहे. यासाठी गटारी व नाले काँक्रिटीकरण करणे कसे गरजेचे आहे. या सर्व बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या. यावेळी आमदार राजू सेठनी कंग्राळी बुद्रुक हद्दीतील वरील वसाहतींचे सांडपाणी वाहून जाणाऱ्या कच्च्या गटारी व मार्कंडेय नदीला मिळणारा नाल्याचे शासकीय निधीतून काँक्रिटीकरण करून देण्याचे आश्वासन दिले. तसेच पावसाळ्यात सदर नाले व गटारीतील वाढलेली झुडूपे व तुंबलेल्या गटारी स्वच्छ करणे गरजेचे असल्यामुळे जेसीबी पाठवून देऊन गटारी व नाला सफाईच्या कामांना सुरुवात करण्यात आली. यावेळी ग्राप पंचायत सदस्य जयराम पाटील, बंदेनवाब सय्यद, ग्राम पंचायत माजी अध्यक्ष गजानन पाटीलसह इतर नागरिक उपस्थित होते.
महानगरपालिकेने कधीच दखल घेतली नाही
सदर सांडपाणी कच्च्या गटारीतून वाहत असल्यामुळे पावसाळ्यात संपूर्ण शिवारात पसरत आहे. तेव्हा गटारींचे काँक्रिटीकरण करून सांडपाणी सोडा म्हणून शेतकरीवर्गाने महानगरपालिकेला निवेदने दिली. परंतु या निवेदनाला कोणीही शासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाहे. यामुळे कंग्राळी बुद्रुकवासीय महानगरपालिकेची ही घाण मुकाट्याने आपल्या हद्दीत घेऊन सहन करून बसत आहे.