राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांचा गौप्यस्फोट: पुढील काळात चित्र स्पष्ट होईल : डिपॉझिट जप्त झालेले जिल्हाप्रमुख हे शिवसेनेचं दुर्देव
प्रतिनिधी/कोल्हापूर
राजकारणात पुढील परिणामांची चिंता न करता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला. सगळेच काही माझ्य़ाप्रमाणे उघडपणे भुमिका घेणारे नसतात. शिवसेनेच्या मेळाव्याला जिल्हय़ातील दोन्ही खासदार अनुपस्थित होते. खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने यांनी सध्या भुमिका स्पष्ट केली नसली तरी ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबतच आहेत. यासंदर्भात पुढील काळात चित्र स्पष्ट होईल, असा गौप्यस्फोट राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी केला.
शिवसेनेच्या शुक्रवारी झालेल्या मेळाव्यानंतर शनिवारी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत त्यांची भुमिका स्पष्ट केली. याप्रसंगी ते बोलत होते.
क्षीरसागर म्हणाले, शिवसेनेच्या मेळाव्यात स्टेजवर बसलेले अनेक पदाधिकारी आजही माझ्य़ासोबत आहेत. मेळाव्यातूनच त्यांचा मला फोन करुन गैरसमज करु नका आम्ही तुमच्यासोबतच असल्याचे सांगितले आहे. आमच्याकडील काही पदाधिकारी त्यांच्याकडे गेले. पण त्यांच्यातील अनेक पदाधिकारी आजही माझ्य़ासोबत संपर्कात आहेत. पुढील काही दिवसात तेही आमच्यासोबत दिसतील असेही क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.
आमचं कारटं, दुसऱ्याच बाळ
आमचं बाळ दुसऱयाच ते कारटं अशी म्हण आहे. पण शिवसेनेत उलट आहे. आमचं कारट, दुसऱयाचा बाळा अशी अवस्था शिवसेनेत आहे. उत्तरच्या पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार विजयी झाल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह काँग्रेस, राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी माझे अभिनंदन केले. मात्र शिवसेनेचे नेते क्षीरसागर यांनी पोटनिवडणुकीत गद्दारी केली असे म्हणतात. मातोश्रीवरही त्यांनी माझ्य़ाबाबत चुकीचा संदेश दिला. मात्र तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी आपण किती राबलो हे पक्षप्रमुखांना सांगितल्याने यांचे खरे चेहरे समोर आले, असे क्षीरसागर यांनी सांगितले.
हे ही वाचा : Kolhapur : मुलाखतींच्या भूलथापांना बळी पडू नका
डिपॉझिट जप्त झालेले जिल्हाप्रमुख दुर्देव
महापालिका निवडणुकीत ज्यांची डिपॉझिट जप्त झाली ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आहेत हे दुर्देव आहे. ते मला गद्दार म्हणत असले तरी विधानसभा निवडणुकीत त्यांनी वेळोवेळी मला पाडण्याचा प्रयत्न केला. पक्षाक्षी वेळोवेळी तेच गद्दारी करत आले आहेत. म्हणूनच निवडून येण्याचे संख्याबळ असतानाही राज्यसभा निवडणुकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. ताट भरल होत पण ते त्यांना खाता आलं नाही, कर्माची फळ ही अशाच पद्धतीने मिळत असतात, अशी टिका क्षीरसागर यांनी जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्यावर केली.
मी खरा शिवसैनिक, अन्य पदाधिकारी आयात झालेले
कोल्हापूरात शिवसेनेच्या स्थापनेपासून मी आहे. सध्याचे जे पदाधिकारी आहेत ते एक जिल्हाप्रमुख काँग्रेसमधून दुसरे शेतकरी कामगार पक्षातून तर अन्य दोघे शहरप्रमुख सर्व पक्ष फिरुन शिवसेनेत आले आहेत. आज त्यांच ऐकून शिवसेनेचे नेते माझ्यावर टिका करत आहेत यांची खंत वाटत असल्याचे क्षीरसागर यांनी सांगितले.
आशिर्वाद घेणे चुकीचे आहे का
चंद्रकांतदादा ज्येष्ठ नेते आहेत. त्यांचा आशिर्वाद घेणे चुकीचे आहे का. राजकारणात टिकाटिप्पणी होत असतात. मला नवीन सुरवात करायची आहे. मी काय आहे, जिल्हय़ात शिवसेना कोणी वाढवली हेही दादांनाही माहिती आहे. त्यामुळे कुणीही त्यांना काहीही सल्ले दिले तरी दादा सत्य जाणून आहेत, असे क्षीरसागर म्हणाले.
पाच वर्ष माझा वापर केला
महायुतीच्या काळात पक्षाच्या नेत्यांच्या आदेशानुसार वेळोवेळी चंद्रकांत दादा यांच्यावर टिका केली. पक्षाचे काम आदेश मानून केले. मात्र मी दादांवर आरोप करत असताता हे त्यांच्यासोबत बार्गेनिंग करत बसायचे. स्वतःच महत्त्व वाढविण्यासाठी त्यांनी गेली पाच वर्ष माझा वापर केल्याची टिकाही त्यांनी शिवसेनेतील ज्येष्ठ नेत्यांवर केली.
मुंबईत 15 दिवस व्यवस्था कोणी केली
जेवण्याचे बील घेतले अशी माझ्यावर टिका करत आहेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी पंधरा दिवस मुंबईत होता. वास्तविक त्यांची व्यवस्था पक्षाने करणे अपेक्षित होती. मात्र त्यांची व्यवस्था मी करुन दिली. मग या 15 दिवसांचेही बील तुमच्या कडून घ्यायला हवे होते, अशी टिका क्षीरसागर यांनी पवार यांच्यावर केली.