दिलजमाईच्या कथित दाव्यानंतर वक्तव्य : काँग्रेसमधील धूसफूस कायम असल्याचे संकेत
वृत्तसंस्था/ जयपूर
राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी पुन्हा एकदा राज्य काँग्रेसमधील वाद कायम असल्याचे संकेत दिले आहेत. अशोक गेहलोत सरकारला ज्या मुद्द्यावर्रन त्यांनी अल्टीमेटम दिला होता, तेच मुद्दे पायलट यांनी पुन्हा उपस्थित केले आहेत. तरुण-तरुणींसाठी नेहमीच संघर्षच केला आहे. आमच्यासारख्या लोकांनी तरुणाईचे प्रश्न न मांडल्यास त्यांच्या आशाआकांक्षा संपुष्टात येतील. पेपर लीक असो किंवा परीक्षा रद्द होण्याचा मुद्दा, रोजगार अन् नोकरीच्या मुद्द्याला आम्ही प्राथमिकता दिली नाही तर आमची प्राथमिकता काय असेल असे प्रश्नार्थक विधान करत पायलट यांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्ष स्वरुपात अशोक गेहलोत सरकारला लक्ष्य केले आहे.
राजकीय जीवनात कुठल्याही पदावर राहिलो किंवा नाही राहिलो तरीही राज्यातील तरुण-तरुणींचे मुद्दे मांडण्यास कधीच मागे पडलो नाही. आम्ही आमची भूमिका मांडणे सोडून दिले आहे असा गैरसमज कुणीच करून घेऊ नका. आम्ही आमच्या मागण्यांवर ठाम आहोत आणि त्या पूर्ण करवून घेणारच असे उद्गार पायलट यांनी काढले आहेत.
कुठल्याही पक्षाचे सरकार असले तरीही तरुणाईलाच प्राथमिकता दिली जाणे आवश्यक आहे. तरुणाईसाठी आम्ही काय करू शकतो हे पाहिले जावे. जर कुणासोबत अन्याय होत असल्यास आणि त्याकडे दुर्लक्ष होत असल्यास आम्ही ते सहन करणार नसल्याचे पायलट यांनी म्हटले आहे.
काहीही झाले तरी जनतेपासून मला कुणीच दूर करू शकत नाही. हे निवडणुकीचे वर्ष आहे, महामार्गावरून काही लोक येत आहेत तर काही जण जात आहेत, आतापासूनच राजकीय दौरे सुरू झाल आहेत. महामार्गावरून जाणाऱ्या लोकांना गैरसमज आहेत, तर आमची नाळ जनतेसोबत जोडली गेलेली असून ती कुणीच तोडू शकत नसल्याचे म्हणत पायलट यांनी एकप्रकारे अशोक गेहलोतांना लक्ष्य केले आहे. अशोक गेहलोत हे सध्या राज्यव्यापी दौरा करत आहेत.
काही दिवसांपूर्वी सचिन पायलट अन् अशोक गेहलोत यांच्यात दिलजमाई घडवून आणण्याचा प्रयत्न काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांनी केला होता. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि पायलट यांच्यात समेट झाल्याचा दावा काँग्रेसकडून करण्यात आला होता. परंतु पायलट यांचे नवे वक्तव्य पाहता काँग्रेसमधील कलह कायम असल्याचे स्पष्ट होते.
पायलट यांचा मोठा प्रभाव
पूर्व राजस्थानातील 8 जिल्ह्यांमध्ये सचिन पायलट यांचा मोठा प्रभाव असल्याचे मानले जाते. यात अजमेर, टोंक, दौस, अलवर, करौली, भरतपूर, सवाई माधोपूर, धौलपूर जिल्हे सामील आहेत. या जिल्ह्यांमध्ये एकूण 58 विधानसभा मतदारसंघ आहेत. गुर्जर समुदायाला प्रामुख्याने भाजपसमर्थक मानले जाते, परंतु 2018 च्या विधानसभा निवडणुकीत सचिन पायलट यांच्यामुळे या समुदायाने काँग्रेसला मतदान केल्याचे मानले जाते. राज्यातील 15 जिल्ह्यांमध्ये गुर्जर समुदायाचे लक्षणीय प्रमाण आहे. येथील सुमारे 22 विधानसभा मतदारसंघांमध्ये गुर्जर मतदार निर्णायक भूमिकेत आहेत. याचबरोबर सुमारे 20 मतदारसंघांमध्ये गुर्जर समुदायाचे मतदार लक्षणीय संख्येत आहेत.