संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची माहिती ः सरकार स्वावलंबनावर भर देत असल्याचीही स्पष्टोक्ती
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भविष्यातील सुरक्षा आव्हानांना प्रभावीपणे सामोरे जाण्यासाठी सरकार एक मजबूत, सुरक्षित आणि स्वावलंबी लॉजिस्टिक सिस्टम (सेना सहायता प्रणाली) तयार करण्यासाठी वचनबद्ध असल्याची ग्वाही संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारी दिली. येथे लष्कराच्या लॉजिस्टिक्सवरील चर्चासत्राला संबोधित करताना त्यांनी तीन सेवांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार देशात समान लॉजिस्टिक नोड्स (सेना सहायता पुरवठा केंद्रे) स्थापन करण्यावर भर देत असल्याचे प्रतिपादन केले. या केंद्रांद्वारे एका सेवेची संसाधने उर्वरित क्षेत्रांना अखंडपणे उपलब्ध करून दिली जातील, असे ते म्हणाले.
संरक्षणमंत्र्यांनी लॉजिस्टिक प्रणाली अधिक बळकट करण्यासाठी आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार राहण्यासाठी नागरी-लष्करी यंत्रणेला एकत्र येण्याचे आवाहन केले. आम्ही तिन्ही सेवांच्या एकत्रिकरणाकडे वाटचाल करत असताना या संयुक्ततेचा सर्वाधिक फायदा झालेल्यांपैकी लॉजिस्टिक हे महत्त्वाचे क्षेत्र असल्याचेही त्यांनी नमूद केले. तिन्ही सेवांच्या गरजा लक्षात घेऊन सरकार कॉमन लॉजिस्टिक नोड्स उभारण्यावरही भर देत आहे. या सुविधेमुळे एका सेवेची संसाधने दुसऱया सेवेला अखंडितपणे उपलब्ध होऊ शकतील, असे त्यांनी सांगितले. सिंह यांनी येथील माणेकशॉ सेंटरमध्ये आयोजित पहिल्या इंडियन आर्मी लॉजिस्टिक सेमिनारमध्ये ‘सामंजस्य से शक्ती’ या विषयावर उपस्थित सेनाधिकाऱयांना मार्गदर्शन केले.
भविष्यातील युद्धांमध्ये लॉजिस्टिकसाठी केवळ तीन सेवांमध्येच नव्हे, तर औद्योगिक क्षेत्र, संशोधन आणि विकास, भौतिक सहाय्य, उद्योग आणि मनुष्यबळाच्या रूपात विविध संस्थांमध्ये जोडणी आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला. संरक्षणमंत्र्यांनी नागरी आणि लष्करी भागधारकांमध्ये आवश्यक असलेल्या समन्वयाबद्दलही भाष्य केले. तसेच भारत ‘अमृत काळ’च्या उंबरठय़ावर उभा असताना ध्येय साध्य करण्यासाठी प्रतिबद्धता दर्शविली. त्यांनी माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान आर्किटेक्चरवरही आपले विचार व्यक्त केले आणि लॉजिस्टिक प्रणालीचा एक महत्त्वाचा भाग म्हणून वर्णन केले.
अनेक धोरणे तयार
स्वावलंबी भारत हा लॉजिस्टिकमधील एक महत्त्वाचा दृष्टिकोन असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सरकारने अनेक धोरणे तयार केली आहेत. 21 व्या शतकाला अनुसरून लॉजिस्टिक व्यवस्थेत सुधारणा करणे ही काळाची गरज असल्याचे केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह म्हणाले. भारताने रेल्वे आणि वाहतूक क्षेत्रातही झपाटय़ाने प्रगती केल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.