प्रतिनिधी /फोंडा
शिक्षण हे माणसाच्या प्रगतीचे प्रभावी माध्यम असून ती एक निरंतर प्रक्रिया आहे, असा सल्ला अर्थतज्ञ व काणकोणच्या मल्लिकार्जून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मनोज कामत यांनी दिला. फोंडा फर्स्ट या संस्थेतर्फे आयोजित केलेल्या फोंडा तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गौरव सोहळय़ात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते.
शांतीनगर-फोंडा येथील रुक्मिणी सभागृहात रविवारी झालेल्या या कार्यक्रमात साधारण 350 विद्यार्थ्यांना गौरविण्यात आले. यावेळी व्यासपीठावर फोंडा फर्स्टचे अध्यक्ष राजेश वेरेकर, खास निमंत्रीत अमेरिकास्थित ईशान शेटये, पालकांचे प्रतिनिधी म्हणून गोवा विद्यापीठाचे ग्रंथपाल डॉ. संदेश देसाई, नगरसेवक विलियम आगियार व कल्पेश पारकर हे उपस्थित होते.
ईशान शेटये म्हणाले, विद्यार्थ्यांनी जीवनात मुल्ये व तत्त्वाना महत्त्व देऊन भरपूर वाचन, चिंतन व आकलन करावे. विद्यार्थी जीवनात शिस्त महत्त्वाची आहे. तसेच यश व ध्येयप्राप्तीनंतर पालक, शिक्षक व मातृभूमिला विसरता कामा नये. डॉ. संदेश देसाई यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगून पालकांनी लहान वयातच मुलांना वाचनाची गोडी लावण्याचा सल्ला दिला. आपल्या स्वागतपर भाषणात राजेश वेरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांनी अपयशाबद्दलची मनातील भिती बाजूला सारुन नेहमीच सकारात्मक दृष्टोकोन बाळगावा. आत्मविश्वासाच्या बळावर आपण कोणतेही आव्हान पेलू शकतो. सुझन मेडिंस या विद्यार्थीनीने मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नितीन कोलवेकर यांनी तर कल्पेश पारकर यांनी आभार मानले.