मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय : 132 कोटी रुपये खर्चाची तरतूद
प्रतिनिधी /बेंगळूर
विरोधी पक्षांकडून ताशेरे ओढण्यात आल्यानंतर अखेर राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत बूट आणि सॉक्स वितरीत करण्याचा निर्णय घेतला आहे. शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत बूट-सॉक्स वितरण करण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
कोरोना परिस्थितीमुळे राज्य सरकारची आर्थिक परिस्थिती कोलमडल्याने मागील दोन वर्षांपासून सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना बूट आणि सॉक्सचे वितरण झाले नव्हते. सध्या शाळा सुरू होऊन दोन महिन्यापेक्षा अधिक काळ उलटला आहे. त्यामुळे यंदा देखील विद्यार्थ्यांना बूट-सॉक्सचे वितरण होणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होत होता. विरोधी पक्षांनी याच मुद्दय़ावरून शिक्षण खात्याला फैलावर घेतल्यानंतर राज्य सरकारने यंदाच्या शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांना बूट, सॉक्स वितरण करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती.
अखेर शुक्रवारी पार पडलेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विद्या विकास योजनेंतर्गत 2022-23 या शैक्षणिक वर्षात सरकारी शाळांमधील पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मोफत एक जोड बूट आणि सॉक्स वितरीत करण्यास मंजुरी दिली आहे. याकरिता 132 कोटी रुपये अनुदान दिले जाणार आहे. शाळा सुधारणा आणि व्यवस्थापन समित्यांनाच ते खरेदी करून वितरीत करण्याची मुभा देण्यात आली आहे.
कैद्यांच्या सुटकेच्या नियमांत बदल
स्वातंत्र्यदिनी कैद्यांची सद्वर्तणुकीच्या आधारे मुक्तता करण्याची पद्धत आहे. मात्र, सुटका होणाऱया कैद्यांमध्ये अत्याचार प्रकरणी शिक्षा भोगणाऱया कैद्यांचाही समावेश असतो. त्यामुळे गृहखात्यावर टीका होते. त्यामुळे सरकारने अत्याचार आणि पोक्सो कायद्यांतर्गत शिक्षा भोगणाऱया कैद्यांची सद्वर्तणुकीच्या आधारे मुक्तता न करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंबंधीच्या नियमांना शुक्रवारी मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
हिरण्यकेशीतून हुक्केरी तालुक्यातील 19 तळय़ांमध्ये पाणी
राज्य सरकारने नद्यांचे पाणी तळय़ांमध्ये साठविण्याची योजना हाती घेतली आहे. या योजनेंतर्गत आता हुक्केरी तालुक्यातील नदीतून तालुक्यातील 19 तळय़ांमध्ये पाणीसाठा करण्याच्या कामांना मंजुरी दिली आहे. या योजनेसाठी अंदाजे 42.50 कोटी रुपये खर्च होणार आहे. बागलकोट तालुक्यातील मुचखंडी तलावात घटप्रभा नदीतून कालव्याद्वारे पाणी साठविण्याच्या दुसऱया टप्प्यातील कामालाही प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. या कामासाठी अंदाजे 49 कोटी रुपये खर्च येणार आहे.
बहुग्राम पाणीपुरवठा अंतर्गत बेळगाव जिल्हय़ात कोटय़वधींच्या कामांना मंजुरी
जलजीवन मिशन योजनेंतर्गत अथणी तालुक्यातील सत्ती आणि इतर 8 गावांना बहुग्राम पाणीपुरवठा योजनेच्या 71 कोटी रुपयांच्या सुधारित आराखडय़ालाही मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे. बेळगाव तालुक्यातील 11 गावे, एम. के. हुबळी तसेच सौंदत्ती तालुक्यातील यरझर्वी आणि आसपासच्या 30 गावे (35 लोकवस्त्या), बैलहोंगल तालुक्यातील 55 गावांमध्ये (59 लोकवस्त्या) बहुग्राम पाणीपुरवठा योजनेकरिता 410 कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. ही योजना राबविण्यासाठी मंत्रिमंडळाने प्रशासकीय मंजुरी दिली आहे.
कित्तूर तालुक्यातील देगांव आणि इतर 16 गावे (29 लोकवस्त्या), खानापूर तालुक्यातील 104 गावे (135 लोकवस्त्या), बेळगाव तालुक्यातील 2 गावे आणि कित्तूर शहरासाठी बहुग्राम पाणीपुरवठा योजना डीबीओटी तत्त्वावर राबविण्याच्या 565 कोटी रुपयांच्या योजनेला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.