खानापूर निवड चाचणी स्पर्धेत खळाडूंची निवड : कुस्तीगीर परिषदेचे आयोजन
खानापूर वार्ताहर
राज्यात महाराष्ट्र केसरी किताबासाठी लवकरच राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. या स्पर्धेसाठी सांगली जिल्हास्तरीय निवड चाचणी खानापूर येथील मातोश्री मंगल कार्यालयाच्या मैदानावर पार पडली. यात जिल्ह्यातील शेकडो खेळाडूंनी सहभाग घेतला होता. यात माती व मॅट या दोन्ही गटातील खेळाडूंनी आपले पूर्ण योगदान देत महाराष्ट्र केसरीसाठी निवड निश्चित केली आहे. यात खुल्या गटातून गादी प्रकारात सुबोध पाटील याने माती प्रकारात संदीप मोटे याने अंतिम फेरी गाठत स्पर्धेतील स्थान निश्चित केले.
खानापूर येथे जिल्हा तालीम संघ व महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेच्या माध्यमातून २४ व २५ डिसेंबर रोजी पार पडलेल्या सांगली जिल्हा स्तरीय कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. जिल्हाध्यक्ष नामदेवराव मोहिते, उपाध्यक्ष राजेंद्र शिंदे, सचिव प्रताप शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी जिल्हा परिषद सदस्य सुहास शिंदे, महेश जाधव, सज्जन बाबर यांनी संयोजन केले.
या स्पर्धेत विजयी होऊन महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी निवड झालेले खेळाडू पुढीलप्रमाणे : खुला गट माती प्रकार संदीप मोटे, माती विभाग ९७ किलो अभिषेक घार्गे, ९२ किलो सयाजी जाधव, ८६ किलो सचिन माने, ७९ किलो अंकुश माने, ७४ किलो श्रीकांत निकम, ७० किलो मयूर जाधव, ६५ किलो अतुल चौगुले, ६१ किलो तेजस पाटील, ५७ किलो रोहित तामखडे यांची निवड झाली. तसेच गाडी प्रकारात सुबोध पाटील खुला गट, ९७ किलो सागर तामखडे, ९२ किलो विश्वजीत रुपनर, ८६ किलो भारत पवार, ७९ किलो प्रथमेश गुरव, ७४ किलो अतुल नायकल, ७० किलो नाथा पवार, ६५ किलो सुनील बंडगर, ६१ किलो प्रकाश कोळेकर, ५७ किलो निनाद बडरे यांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धेसाठी सांगली जिल्ह्यातून निवड निश्चित केली. ही स्पर्धा पुणे व अहमदनगर येथे घेतली जाणार आहे. निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी सांगली जिल्हा पंच कमिटीने मोलाचे योगदान दिले. यावेळी खानापूरचे नगराध्यक्ष डॉ उदयसिंह हजारे, आंतरराष्ट्रीय कुस्ती कोच उत्तम पाटील, परशुराम गायकवाड, कृष्णदेव शिंदे, अशोक शिंदे, अमित शिंदे, संदीप गायकवाड, ओंकार पाटील, राजन पवार, अतुल जाधव, विठ्ठलसिंग रजपूत यांच्यासह कुस्ती प्रेमी उपस्थित होते.