राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सिमंतकुमार सिंग यांचे प्रतिपादन : केएसआरपीचे पथसंचलन
बेळगाव : कौशल्य आणि क्षमतेमध्ये सातत्य राखले पाहिजे. त्यामुळे आपण कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होवू शकतो. नोकरी असो किंवा व्यवसाय असो यामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर आपल्याकडे सामर्थ्यदेखील असणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे कर्नाटक राज्य राखीव दलाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक सिमंतकुमार सिंग यांनी सांगितले. कंग्राळी येथील केएसआरपी प्रशिक्षण स्कूलच्या पथसंचलन व बक्षीस वितरण समारंभाला उपस्थित असताना त्यांनी नवीन प्रशिक्षणार्थींना हा सल्ला दिला. प्रशिक्षणानंतर सेवेमध्ये रुजू झाल्यानंतर आपली जबाबदारी वाढते. तेव्हा प्रशिक्षणाच्या कालावधीमध्ये प्रत्येकानेच योग्य प्रकारे शिकले पाहिजे. त्यामुळे भविष्यात प्रभावीपणे आपण कोणतेही काम हाताळू शकतो, असे सांगितले. यावेळी प्रशिक्षणार्थी स्कूलच्या मुख्याध्यापकांना शिस्त व परिश्रम याबाबत काळजी घेण्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी केएसआरपी प्रशिक्षण स्कूलचे प्राचार्य रमेश बोरगावे म्हणाले, कर्नाटक राज्य राखीव विभागाला एक वेगळी यशोगाथा आहे. धैर्य, शिस्त आणि चिकाटी या विभागाला असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. केएसआरपीसी राखीव पोलीस दल हा एक अविभाज्य भाग असून तो सतत कार्यरत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले. या स्कूलमध्ये उत्तम प्रकारे प्रशिक्षण दिले जाते. शारीरिक, निशस्त्र लढा, शस्त्र लढा, लाठी लढाई, कायद्याबाबत आणि व्यवस्थांबाबतचे ज्ञान लढाईचे कौशल्य, गर्दीवरील नियंत्रण याबाबत आम्ही तुम्हाला सर्व ज्ञान दिले आहे. त्याचा तुम्ही भविष्यासाठी उपयोग करा, असे बोरगावे यांनी प्रशिक्षणार्थींना सांगितले. यावेळी एसबीआरएफचे उपसंचालक सी. गुरुलिंगय्या, बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीशकुमार, एम. व्ही. रामकृष्णप्रसाद, पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील, हमजाहुसेन, श्रीनिवास यादव, पी. सिद्धनगौडा पाटील यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते.