झुक झुक आगीनगाडी धुरांच्या रेषा हवेत काढी पळती झाडे पाहूया. मामाच्या गावाला जाऊया. म्हणत म्हणत दरवर्षी उजाडत असायचा उन्हाळा. भयंकर ताप देणारी उन्हं भाजून काढत असताना ती तलखी निवळायची तर धडाधड नदीविहिरीत उड्या मारून जीव शांत करायचा असे. एकदा का महाशिवरात्र झाली की तुळशीवर गळती बांधायची आणि येता जाता तिच्यात पाणी ओतायचं. उन्हाळ्याचं मंगलाचरण या महाशिवरात्रीने सुरू व्हायचं. आणि चैत्रात काही फक्त नवपालवीचा वासंतिक उत्सव नसे तर वर्षभर पुरणाऱ्या आणि उत्तम दर्जाचं खाणं पुरवणाऱ्या असंख्य पदार्थांची वाळवणं भरभरून घातली जात. कोण्या एकेकाळी आंब्यांचं नवं हे अक्षयतृतीयेला केलं जात असे. फारच कष्टाळू आणि निगुतीने आंब्यांची मशागत करणारा बागायतदार असेल तर पाडव्याला नवं व्हायचं फार तर. पण उन्हाळा म्हणजे काही खास गाणीही असतात बरं का! प्रत्येक ऋतूची म्हणून काही खास गाणी असतात. काहींच्या आठवणी त्या त्या मोसमाशी जोडलेल्या असतात. तसं उन्हाळ्यात खासमखास म्हणजे सतत कानावर पडणाऱ्या लग्नगीतांचे आणि ओव्यांचे सूर. त्याची काही ठरलेली गाणी गावात लाऊडस्पीकरवर वाजत असत.
उदाहरणार्थ,
गोरी नवरी मांडवाखाली किंवा नवरा आला वेशीपाशी नवऱ्या नवरी कशी नेशी? देईन येसकऱ्याचा मान नवरी जिंकून नेईन.
यासारखी गाणी तेव्हा फार वाजायची. आणि भर वैशाखात घामाघूम अवस्थेतली नव्याकोऱ्या साडीपोशाखातली ती नवीकोरी जोडी जेव्हा देवदर्शनाला यायची तेव्हा वरच्या बाजूच्या मांडवातला तो लाऊडस्पीकर चक्क
कावळा पिपाणी वाजवतो मामा मामीला नाचवतो
यासारखी गाणी कोकलत असायचा. ही अशी काही गाणी आम्हा ऐकणाऱ्यांना महाविचित्र जरी वाटत असली तरीही ज्या लोकांना त्यांची अपूर्वाई होती त्यांना अगदी धन्य धन्य झाल्यासारखं वाटत असे. याच लाऊडस्पीकरवर लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र अगदी सुंदर सात्त्विक भक्तिगीते लागत असत.
सुंदर ते ध्यान उभे विटेवरी कर कटावरी ठेवोनिया
सारख्या अप्रतिम अभंगाने आमची पहाट अगदी सुरेल होत असे. काही लग्नघरी सनईच्या सुरात कार्य साजरं होत असे. बिस्मिल्ला खाँ साहेबांचे ते अद्भुत स्वर ही तर शुभकार्याची ओळख आहेच. पण विशेषत: ते भर उन्हाळ्यात लग्नकार्यात अगदी शीतल आनंद देतात. उन्हाळा त्याच्या गतीने पुढे सरकत राहतो आणि ती
गाणीही.
उन्हाळा हा माहेरवाशिणींचा आपल्या माहेरी येण्याचा ऋतू असतो तसाच तो भाच्यांचा मामाकडे जाण्याचाही ऋतू असतो. आंबे, गरे खायला, ओल्या काजूची उसळ खायला, म्हशीच्या पाठीवर बसून मळ्यात जायला जी काही मजा येते तिच्यासारखी तीच. याच चैत्री उन्हाळ्यात येते ती चैत्रगौर. मग तिचे तऱ्हेतऱ्हेचे लाड पुरवले जातात. नुकत्याच पडायला लागलेल्या कैरीचं शानदार पन्हं, तिचाच कीस घालून केलेली झणझणीत आंबेडाळ, तिला बसायला झोपाळा, ल्यायला मोगरीच्या वेण्या, फळाफुलांची दोअंगी सजावट, खमंग खिरापत आणि बरंच काही! तर राजस्थान, उत्तरप्रदेश याठिकाणी या दिवसात गणगौर होते. उत्तर भारतात लोकप्रिय असणारे होरी, चैती हे प्रकार या उन्हाळ्याचीच कौतुकं गातात.
चढ़त चइत चित लागे ना रामा बाबा के भवनवा बीर बमनवा सगुन बिचारो कब होइहैं पिया से मिलनवा हो रामा चढ़ल चइत चित लागे ना रामा
अशा शेकडो चैतीनी उन्हाळा दुमदुमून जात असतो तिकडे. गंगेच्या किनाऱ्यावर उन्हाळी वारे सुटलेले असताना तिथल्या हवेल्यांमध्ये रंगणाऱ्या घरगुती उपशास्त्राrय संगीत मैफली याही जणु कौटुंबिक महोत्सव होऊन जातात. पंढरपुरी विठोबाला उन्हाळा सहन होईनासा होतो आणि मग त्याला उन्हाळी उपचार सुरू होतात. चंदनाच्या लेपाने त्याला मढवून काढतात. दक्षिणेकडील सर्वच देवस्थानात चंदनाचा वापर आणि महत्त्व दोन्हीही अबाधित आहे, पण उन्हाळ्यात तो कौतुकसोहळा जास्तीच असतो. शीतळाई आणि सुगंध अशा दोन्ही गुणांनी युक्त असं चंदन उन्हाळा सुसह्य करतं. म्हणूनच की काय पण एरवी असलेल्या रुक्ष, उष्ण वातावरणात आपल्या लाडक्या सखीला चंदनाची उटी लावणाऱ्या प्रियकराची ही अभिव्यक्ती चित्तवृत्ती प्रसन्न करून सोडते…
लाविली थंड उटी वाळ्याची सखिच्या कुचकलशां ती कमलसुतंतु करी करि कंकण बंधित परि शोभे ती…
शाकुंतल नाटकातील हे गीत पंडित वसंतराव देशपांडेंनी अगदी छान घडवून ठेवलं आहे. आजच्या काळातही प्रियाराधनाचा हा प्रकार भलताच बोल्ड वाटावा असा असला तरी शाकुंतलकालीन उन्हाळा सुसह्यच नव्हे तर प्रिय होता हे यावरून नक्कीच कळतं आपल्याला. उन्हाळा नुसताच रुक्ष नसतो, तीच भाजणारी तापणारी उन्हं धरणीला पाऊसपाणी जिरवण्यासाठी तयार करीत असतात. त्याच उन्हांवर पोसून मोगरे, चाफे दरवळत असतात. वाळ्याच्या गंधित पडद्यांनी वातावरण प्रफुल्लित होत असतं. आंब्याफणसाच्या राशींनी, माहेरवाशिणींच्या बागडण्याने, पावसाच्या तयारीने जो मायेस्त असतो तो उन्हाळा मायाळू तर असणारच ना? हो. उन्हाळ्याने केलेली माया की उन्हाळ्याने रचलेली माया असते कोण जाणे!
-अॅड. अपर्णा परांजपे-प्रभु