वेदनाशामक इंजेक्शन्स घेत खेळत राहिल्याचा रविंद्र जडेजाला फटका
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
डावखुरा अष्टपैलू रविंद्र जडेजा यंदाच्या आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत खेळणार नाही, असे जवळपास स्पष्ट असताना मागील वर्षी डिसेंबरपासूनच त्याला दुखापतीने त्रस्त केले होते. मात्र, केवळ शस्त्रक्रियेचा सल्ला टाळत आल्याने त्याची दुखापत चिघळल्याचे प्रकाशझोतात आले आहे.
गतवर्षी न्यूझीलंडविरुद्ध डिसेंबर महिन्यात पहिल्या कसोटी सामन्यानंतर रविंद्र जडेजाला दुखापत झाल्याचे निदर्शनास आले आणि यामुळे तो दुसऱया कसोटीत खेळू शकला नव्हता. डॉक्टरांनी त्यावेळी जडेजाला गुडघ्यावर शस्त्रक्रिया करवून घेण्याचा सल्ला दिला होता. मात्र, त्यावेळी शस्त्रक्रिया करवून घेतल्यास त्याला 6 महिने सक्तीची विश्रांती घ्यावी लागली असती आणि या परिस्थितीत तो त्यावेळी आयपीएल स्पर्धा खेळू शकला नसता. त्यामुळे, त्याला 16 कोटी रुपये व नेतृत्व अशा दोन्ही बाबी गमवणे भाग पडले असते. स्वतः द्रविड सुद्धा टी-20 विश्वचषक स्पर्धेपूर्वी जडेजा संघात नसावा, यासाठी राजी नव्हते.
यादरम्यान, जडेजासाठी राष्ट्रीय क्रिकेट अकादमी व अन्य काही डॉक्टरांचा सल्ला घेण्यात आला आणि त्यात इंजेक्शन्स घेऊन जडेजाला टी-20 विश्वचषक स्पर्धेपर्यंत गुडघ्याची दुखापत सांभाळता येईल आणि विश्वचषक स्पर्धेनंतर तो शस्त्रक्रिया करवून घेऊ शकेल, असा सल्ला देण्यात आला.
भारताला विश्वचषक जिंकण्यासाठी जडेजा महत्त्वाचा खेळाडू ठरु शकतो, यावर द्रविड ठाम होते. त्या पार्श्वभूमीवर, जडेजाने शस्त्रक्रिया करवून घेण्याऐवजी दुखापत सांभाळत, त्यावर मार्ग काढत खेळत रहावे आणि प्रत्यक्ष सामन्यांमध्ये त्याच्यावर शक्य तितका कमी भार राहील, यासाठी प्रयत्न असावेत, असा निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने गुडघ्यावर अधिक भार पडू नये, यासाठी पुढील कित्येक महिने जडेजाकडे गोलंदाजी कमी स्वरुपात सोपवण्यात आली. गोलंदाजीत गुडघ्यावर अधिक भर पडतो, त्यामुळे हा बदल केले जाणे क्रमप्राप्त होते.
यादरम्यान, फलंदाजीत त्याची उपयुक्तता कायम राखण्यासाठी संघव्यवस्थापनाने टी-20 क्रिकेटमध्ये त्याला चौथ्या स्थानी फलंदाजीला पाठवले. अगदी कसोटी क्रिकेटमध्येही त्याला काही वेळा फलंदाजीत बढती देण्यात आली. गोलंदाजीतील भार मात्र कमीच ठेवला गेला होता. काही टी-20 सामन्यात तर जडेजाने आपला 4 षटकांचा कोटाही पूर्ण केला नाही. मात्र, तरीही दुखापत ही दुखापत असते. दिवसेंदिवस जडेजा सातत्याने खेळत असताना ती चिघळत गेली आणि आता त्याला टी-20 विश्वचषक खेळता येणार नाही, हे जवळपास सुस्पष्ट झाले आहे. इंजेक्शन व रिहॅबिलेशनने काहीही होणार नाही, असे तपासणीनंतर दिसून आल्यानंतर नाईलाजाने शस्त्रक्रियेचा निर्णय घेण्यात आला आहे. शस्त्रक्रिया झाल्यानंतर जडेजा किमान 4 ते 6 महिने खेळू शकणार नाही, असे सध्याचे संकेत आहेत.
सांख्यिकी पाहता, जडेजाने आतापर्यंत खेळलेल्या 64 टी-20 सामन्यात 457 धावा जमवल्या असून 51 बळी घेतले आहेत. आता मागील 3 वर्षात एक खेळाडू म्हणून जडेजा किती प्रगल्भ झाला आहे, हे या आकडेवारीत दिसून येत नसले तरी कसोटी क्रिकेटमध्ये त्याचा स्पेशालिस्ट फलंदाज म्हणून संघात समावेश होत असे, यावरुनच त्याची प्रचिती येते. जुलैमध्ये इंग्लंडविरुद्ध झालेल्या एजबॅस्टन कसोटीत जडेजाने 104 धावांची शानदार खेळी साकारत संधीचे सोनेही केले होते.
जडेजासाठी अक्षर पटेल उत्तम पर्याय!
क्षमता आणि अनुभव या दोन्ही निकषावर अक्षर पटेल हा रविंद्र जडेजा संघात नसेल तर उत्तम पर्याय ठरु शकतो आणि प्रत्यक्ष मैदानावर हे अनेकदा दिसून आले आहे. एखाद्या दिवशी जडेजा फलंदाजी व गोलंदाजी अशा दोन्ही आघाडय़ांवर निराश झाला तरी तो क्षेत्ररक्षणात किमान 10 ते 15 धावा सहज वाचवत असे. अक्षरला त्या निकषावर सुधारणा करावी लागेल.
एरवी, 28 वर्षीय अक्षर पटेल हा जडेजासाठी उत्तम बॅकअप ठरत आला असून ज्यावेळी संधी मिळाली, त्यावेळी त्याने आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे. इंग्लंडविरुद्ध 2021 कसोटी मालिकेत जडेजा दुखापतीमुळे बाहेर फेकला गेला, त्यावेळी अक्षर पटेलने 4 सामन्यांच्या मालिकेत 3 सामन्यात 27 बळी घेत इंग्लिश फलंदाजांना चांगलेच जेरीस आणले. अगदी अलीकडे विंडीज दौऱयात पोर्ट ऑफ स्पेन येथे 35 चेंडूतील नाबाद 64 धावांचा त्याचा झंझावात डोळय़ाचे पारणे फेडणारा ठरला होता.
जेव्हा पाकिस्तानसारख्या कट्टर प्रतिस्पर्धी संघाला वठणीवर आणले!
संघातून वगळणे कठीण आहे, अशा काही मोजक्या खेळाडूंमध्ये रविंद्र जडेजाचा समावेश होतो आणि तो किती महत्त्वाचा खेळाडू आहे, हे यंदाच्या आशिया चषकात पाकिस्तानविरुद्ध मागील आठवडय़ात झालेल्या लढतीत देखील दिसून आले होते.
त्यावेळी संघाचा समतोल साधण्यासाठी डावखुऱया रिषभ पंतला वगळत त्याच्याऐवजी दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. मात्र, प्रत्यक्ष लढतीत पहिले 6 फलंदाज उजव्या हाताने फलंदाजी करणारे असल्याने हा ओव्हरडोस टाळण्यासाठी जडेजाला चौथ्या स्थानी बढती देण्यात आली.
यादरम्यान, अन्य फलंदाज बाद होत राहिले आणि 8 षटकात 2 बाद 50 वरुन 3 बाद 53 आणि 4 बाद 89 अशी भारताची दाणादाण उडत गेली. त्यात सूर्यकुमार बाद झाल्यानंतर डाव सावरण्याची जबाबदारी प्रामुख्याने जडेजावर येऊन पडली आणि तो ती पार करण्यात यशस्वी देखील ठरला. 29 चेंडूत 35 धावा जमवणाऱया हार्दिक पंडय़ासह त्याने पाचव्या गडय़ासाठी 52 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी साकारली. पुढे जडेजा बाद झाला, त्यावेळी संघाचा विजय ही औपचारिकता होती. या पार्श्वभूमीवर अक्षर पटेलला जडेजाची जागा सक्षमपणे भरुन काढण्यासाठी आपला अनुभव पणाला लावावा लागेल, हे साहजिक आहे.