प्रयाग चिखली वार्ताहर
वडणगे (ता. करवीर) येथील दिंडे कॉलनीमध्ये राहणारे मधुकर दिनकर कदम (वय. 59) व जयश्री मधुकर कदम (वय. 50) या दांपत्याचा बुधवारी सकाळी संशयास्पद मृत्यू झाला.मधुमेहावरील आयुर्वेदिक औषध घेतल्यानंतर काही वेळातच या पती-पत्नीचा मृत्यू झाल्याने त्या औषधाची रिअॅक्शन आली असावी, अशी शंका या दापत्याच्या मुलींनी वर्तवली आहे.दोघांचाही विसेरा राखून ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.दरम्यान,पती-पत्नीचा संस्यास्पद मृत्यू झाल्याची घटना घडल्याने वडणगे परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबतची माहिती अशी, कदम दापत्य हे मूळचे कोल्हापुरातील शिवाजी पेठ येथील असून,कदम हे एसटी महामंडळातून सेवानिवृत्त झाले आहेत. वर्षभरापूर्वी ते वडणगे येथील दिंडे कॉलनी येथे दोन मुलीसह नवीन घरात राहायला आले होते.कदम दांपत्याला काही दिवसांपासून मधुमेहाचा त्रास सुरू होता. पंधरा दिवसापूर्वी दोघांनी मुक्त सैनिक वसाहत येथील एका डॉक्टरकडून आयुर्वेदिक औषध घेतले होते.बुधवारी सकाळी दोघांनी औषधी पावडर पाण्यात मिसळून घेतली. त्यानंतर मधुकर कदम हे दूध आणण्यासाठी बाहेर गेले.त्यांची पत्नी स्वयंपाक करत होत्या.
काही वेळातच जयश्री यांना अस्वस्थ वाटू लागले व श्वास घेण्यास त्रास होऊ लागला.त्यानंतर त्या बेशुद्ध पडल्या.दूध आणण्यासाठी शिवपार्वती चौकातील डेअरीत गेलेले मधुकर कदमही चक्कर येऊन पडल्याचे नागरिकांना दिसले.नागरिकांनी कदम दापत्याला शहरातील सीपीआरमध्ये उपचारासाठी नेले असता. डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर दोघांचाही मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले.यानंतर त्यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात आली.व्हिसेरा राखून ठेवण्यात आला असून शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होणार आहे.करवीर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाली असून पोलीस तपास करत आहेत.त्यांच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
दोन मुलींना धक्का
कदम हे मूळचे शिवाजी पेठेतील असून सद्या वडणगे येथे राहायला गेले होते. त्यांना गायत्री (वय-19) आणि विजया (वय-17) या दोन मुली आहेत. आई-वडिलांच्या अचानक मृत्यूमुळे या दोन्ही मुलींना धक्का बसला आहे.गायत्री ही बी.टेक.च्या प्रथम वर्षाला आहे तर विजया दहावीला आहे.