नागरिकांसह शाळेच्या विद्यार्थ्यांचे हाल
प्रतिनिधी /खानापूर
खैरवाड येथील संपर्क रस्त्याची दैनावस्था झाली असून या रस्त्यातून वाट काढताना गावकरी, विद्यार्थी, महिलांचे मोठे हाल होत आहेत. या रस्त्यावरून दुचाकी वाहने अनेक वेळा घसरून पडल्याच्याही घटना घडल्या आहेत. या रस्त्यावर चिखल मोठय़ा प्रमाणात झाला असून दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे.
जि. पं.मधून या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी निधी मंजूर झाला होता. मात्र राजकीय हस्तक्षेपामुळे या रस्त्याचे काम थांबविण्यात आले आहे. यामुळे खैरवाड गावच्या लोकांना नाहक त्रास सोसावा लागत आहे. तसेच या ठिकाणी संगोळी रायण्णा वस्ती शाळा झाल्यामुळे हा रस्ता वाद्ग्रस्त बनला आहे. नंदगड किल्ला ते कित्तूर किल्ला हा रस्ता संगोळी रायण्णा यांच्या वहिवाटीचा होता. हा ऐतिहासिक रस्ता नकाशात नमूद आहे. मात्र गावकऱयांच्या व शाळा प्रशासनाच्या वादामुळेही हा रस्ता अनेक वर्षे न्यायालयीन कचाटय़ात सापडला आहे. याबाबत ग्रा. पं. सदस्य रुक्माण्णा झुंजवाडकर, प्रेमानंद भुजगुरव, प्रवीण कोलेकर, विनोद मिटकर, ज्योतिबा कोलेकर, परशराम असोगेकर, परशराम बावकर यासह अनेकांनी जिल्हा पंचायतीने तातडीने या रस्त्याचे काम करावे, अशी मागणी केली आहे.