24 मंत्र्यांची यादी निश्चित : शनिवारी सकाळीच नावे प्रसिद्ध होण्याची शक्यता
प्रतिनिधी /बेंगळूर
राज्य मंत्रिमंडळ विस्तारासाठी गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी नवी दिल्लीत काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केली. मंत्रिमंडळ विस्तारासाठी दिवसभर सुरू असणारी कसरत सायंकाळी संपली. 24 नूतन मंत्र्यांची यादी तयार करण्यात आली असून ही नावे शनिवारी सकाळी प्रसिद्ध केली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, शनिवार दि. 27 मे रोजी सकाळी 11:45 वाजता नूतन मंत्र्यांचा शपथग्रहण कार्यक्रम होणार आहे. राज्य सरकारच्या विनंतीवरून राज्यपालांनी शपथविधी कार्यक्रमाला हिरवा कंदील दाखविला आहे. राज्य मंत्रिमंडळात आठ मंत्र्यांचा समावेश यापूर्वीच झाला आहे. उर्वरित मंत्रिपदे नेमण्यासाठी बुधवारी सायंकाळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे दोघे दिल्लीला गेले. त्यांच्यापाठोपाठ मंत्रिपदासाठी इच्छुक असणाऱ्या 20 हून अधिक आमदारांनी दिल्ली गाठली. या आमदारांनी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांची भेट घेऊन मंत्रिमंडळात स्थान देण्यासाठी दबाव आणला. गुरुवारी दिवसभर चर्चेच्या फेऱ्या झडल्यानंतर मंत्रिमंडळ विस्ताराचा निर्णय घेण्यात आला. पूर्ण प्रमाणात मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते. बुधवारी रात्री उशिरा काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव के. सी. वेणूगोपाल यांच्या दिल्लीतील निवासस्थानी खलबते झाली. मात्र, अंतिम निर्णय झाला नाही. गुरुवारी सकाळी पुन्हा के. सी. वेणूगोपाल, कर्नाटक काँग्रेस प्रभारी रणदीप सुरजेवाला, सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांची बैठक झाली. यावेळी कोणाकोणाला मंत्रिपदे द्यावीत, यावर एकमत झाले नाही. त्यामुळे दुपारी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी यांच्या निवासस्थानी बैठक झाली. यावेळी सिद्धरामय्या आणि शिवकुमार यांनी आपापल्या समर्थक आमदारांना मंत्रिमंडळात स्थान मिळावे यासाठी प्रयत्न केले. पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीचा विचार करून प्रादेशिकता, जिल्हा आणि जातीय समतोल राखत मंत्र्यांची यादी निश्चित करण्यात आली. अनेक युवा नेत्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचा निर्णय काँग्रेसश्रेष्ठींनी घेतल्याचे समजते. त्यामुळे ज्येष्ठ आमदारांना मंत्रिपदांपासून वंचित रहावे लागण्याची दाट शक्यता आहे.
खातेवाटप डोकेदुखी ठरण्याची शक्यता
राज्य मंत्रिमंडळात सध्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आठ मंत्री असे एकूण 10 जणांचा समावेश झाला आहे. राज्य मंत्रिमंडळात 34 जणांना स्थान देता येते. त्यामुळे आणखी 24 जणांना मंत्रिपदे देऊन पूर्ण प्रमाणात मंत्रिमंडळाची रचना केली जात आहे. एक महिला आणि एका विधानपरिषद सदस्याचाही मंत्रिमंडळात समावेश केला जाणार असल्याचे सुत्रांकडून समजते. शनिवारी नूतन मंत्र्यांचा शपथविधी पार पडल्यानंतरच खातेवाटप होणार आहे. मात्र, प्रभावी खात्यांसाठी यापूर्वीपासूनच चढाओढ निर्माण झाली आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्तारापेक्षा खातेवाटपच हायकमांडसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.
सात-आठ नव्या चेहऱ्यांना संधी?
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने बहुमत मिळविले आहे. लिंगायत उमेदवारांना अधिक संधी दिल्याचा लाभ काँग्रेसला झाला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळात लिंगायत आमदारांना प्राधान्य देण्यात येत असल्याचे समजते. शिवाय ज्येष्ठ आमदारांना वगळून सात ते आठ नव्या चेहऱ्यांना संधी मिळू शकेल.
संभाव्य मंत्री
- बसवराज रायरे•ाr
- कृष्णभैरेगौडा
- दिनेश गुंडूराव
- शिवानंद पाटील
- शिवराज तंगडगी
- के. एन. राजन्ना
- लक्ष्मी हेब्बाळकर
- हिरियुर सुधाकर
- एच. के. पाटील
- रहिम खान
- ईश्वर खंड्रे
- चेलुवरायस्वामी
- एस. एस. मल्लिकार्जुन
- पुट्टरंग शेट्टी
- डॉ. एच. सी. महादेवप्पा
- भैरती सुरेश
- शिवलिंगेगौडा
- मंकाळू वैद्य
- मधू बंगारप्पा
- अजय सिंग