शहर महिला काँग्रेसचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव : अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्यावतीने बेंगळूर येथील फ्रिडम पार्कवर आंदोलन करण्यात येत होते. यावेळी पोलिसांनी त्या महिलांवर लाठीमार केला. यामध्ये अनेक महिला जखमी झाल्या. तर एका महिलेचा मृत्यूदेखील झाला आहे. भाजप सरकारमुळे ही घटना घडली असून पोलिसांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी बेळगाव शहर महिला काँग्रेस कमिटीच्यावतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
लोकशाही मार्गाने अंगणवाडी कर्मचारी महिला फ्रिडम पार्कवर आंदोलन करत होत्या. गेल्या अनेक दिवसांपासून आपल्या मागण्यांसाठी रात्रंदिवस त्यांनी आंदोलन केले. लहान मुलांसह आंदोलन करत असताना पोलिसांनी अमानुषपणे त्यांच्यावर लाठीहल्ला केला. यामध्ये अनेक महिला गंभीर जखमी झाल्या तर एका अंगणवाडी शिक्षिकेचा मृत्यूदेखील झाला आहे. इतकी गंभीर घटना घडली असताना सरकारने अद्याप कोणतीच कारवाई केली नाही. ही बाब अत्यंत खेदजनक आहे. तेव्हा याची संपूर्ण चौकशी करून पोलिसांवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. अप्पर जिल्हाधिकारी अशोक दुडगुंटी यांना निवेदन देताना लता माने, जयश्री माळगी, सलिमा गोकाकवाले, लता अनसुरकर, मंजुळा शिंदे, सुजाता सनदी, अलमास गोकाक, अनिता शिवराई यांच्यासह महिला उपस्थित होत्या.