येत्या दोन दिवसात ठोस निर्णय : राज्य सरकारकडून सकारात्मक संकेत
बेळगाव : शिक्षक बदली प्रक्रियेला राज्य सरकारने हिरवा कंदील दर्शविला आहे. शिक्षक बदली प्रक्रियेतील तांत्रिक त्रुटी आणि निवडणूक आचारसंहिता यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया लांबणीवर पडली होती. परंतु, येत्या दोन दिवसात यावर ठोस निर्णय घेऊन बदली प्रक्रिया सुरू होईल, असे संकेत राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे मागील अनेक दिवसांपासून बदलीसाठी वाट पाहणाऱ्या शिक्षकांना लवकरच आनंदाची बातमी मिळण्याची शक्यता आहे. 2021-22 या शैक्षणिक वर्षात शिक्षक बदलीसाठी कौन्सिलिंग घेतले जाणार होते. त्यापूर्वी परस्पर बदलीसाठी अर्जही मागविण्यात आले. परंतु, बदली प्रक्रियेमध्ये तांत्रिक त्रुटी आढळल्याने राज्यभरातील संपूर्ण प्रक्रिया थांबविण्यात आली. शिक्षण विभागाच्या काही त्रुटींविरोधात काही शिक्षकांनी न्यायालयात धाव घेतली. त्यामुळे ही प्रक्रिया लांबणीवर पडली. बदली प्रक्रियेत बदल केल्यानंतर 10 मार्चपासून बदली प्रक्रियेला सुरुवात होण्याची शक्यता होती. परंतु, पुन्हा एकदा विधानसभा निवडणुकांची आचारसंहिता जाहीर झाल्याने त्याला खो बसला.
राज्यात 75 हजारहून अधिक शिक्षकांचे बदलीसाठी अर्ज
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी शिक्षक बदली प्रक्रिया पूर्ण करण्याचा प्रयत्न शिक्षण विभागाचा होता. परंतु, तो शक्य होऊ शकला नाही. राज्यात 75 हजारहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केले आहेत. यापैकी 30 हजार शिक्षकांना लाभ होण्याची शक्यता आहे. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर आता तरी शिक्षक बदली प्रक्रियेला प्रारंभ करावा, अशी मागणी अनेक दिवसांपासून होत होती. अखेर कर्नाटक राज्य प्राथमिक संघ बेंगळूरचे सेक्रेटरी चंद्रशेखर नुगली यांनी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली.
दोन दिवसात बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होणार
मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीदरम्यान सकारात्मक चर्चा करण्यात आली. अतिरिक्त शिक्षकांची यादी तयार करण्यात आली असून त्याद्वारे बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. बेळगाव जिल्ह्यातून 3 हजाराहून अधिक शिक्षकांनी बदलीसाठी अर्ज केल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. येत्या दोन दिवसात शिक्षक बदली प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यानंतरच हे संपूर्ण चित्र स्पष्ट होईल.