संयुक्त राष्ट्रसंघाच्या दुसऱया जागतिक भौगोलिक माहिती परिषदेत पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात उच्च तंत्रज्ञान हे सर्वसमावेशकतेचे साधन म्हणून उपयोगात आणले जात आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त राष्ट्रसंघाच्या दुसऱया भौगोलिक माहिती काँगेसच्या उद्घाटनच्या प्रसंगी केले आहे. या परिषदेचा प्रारंभ त्यांच्या हस्ते मंगळवारी हैदराबाद येथे करण्यात आला. ही परिषद तीन दिवस चालणार असून या परिषदेत 120 देशांमधून 2000 हून अधिक प्रतिनिधी सहभागी होणार आहेत, अशी माहिती परिषदेच्या आयोजकांनी दिली आहे.
भौगोलिक माहिती तंत्रज्ञानाचा उपयोग माहितीच्या वेगवान आदानप्रदानासाठी केला जातो. भारतात ग्रामीण भागाच्या अचूक मापनासाठी हे तंत्रज्ञान अलिकडच्या काळात उपयोगात आणण्यात येत आहे. त्याचप्रमाणे भूभागांचे भौगोलिक सर्वेक्षण, नकाशे तयार करणे, स्थावर मालमत्तांच्या सीमारेखा ठरविणे इत्यादी कामांसाठीही या तंत्रज्ञानाचा उपयोग केला जातो. ही कामे मानवी हातांनी करण्यापेक्षा या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने केली तर अधिक वेगवान पद्धतीने आणि अचूक प्रकारे होऊ शकतात. शिवाय या कामांमध्ये कोणत्याही प्रकारची अफरातफर आणि भ्रष्टाचार होऊ शकत नाही. हे या तंत्रज्ञानाचे वैशिष्टय़ मानले जात आहे.
पायाभूत सुविधांची निर्मिती
भौगोलिक माहिती तंत्रज्ञानाच्या उपयोगाने शहरे आणि ग्रामीण भागांमध्ये पायाभूत सुविधांचा विकास घडविण्यामध्ये मोलाची प्रगती झाली आहे. हे तंत्रज्ञान उपग्रहांच्या क्षमतेवर आधारित आहे. अवकाशात सोडलेल्या उपग्रहांनी पाठविलेली छायाचित्रे आणि माहिती यांच्या आधारे भूमीवर चाललेल्या कामांचा अचूक आढावा घेतला जाऊ शकतो. या कामांचे प्रतिदिन सर्वेक्षण केले जाऊ शकते. त्यामुळे कामांचा वेग वाढतो आणि गुणवत्ताही वाढते असे दिसून आले आहे.
नवनिर्मितीचे स्वातंत्र्य
भारताच्या राजकीय स्वातंत्र्याला नुकतीच 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. मात्र, विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा विकास फारसा झाला नाही. तंत्रज्ञान आणि नवनिर्मितीच्या संदर्भात भारत मोठय़ा प्रमाणात विदेशांवर अवलंबून राहिला. त्यामुळे आर्थिकदृष्टय़ा तो प्रगती वेगाने करु शकला नाही. आता आपण नवतंत्रज्ञान विकासातही स्वातंत्र्य मिळविले पाहिजे. देशात तंत्रज्ञान विकास होऊन नवे वैज्ञानिक शोध लागले तरच देशाचा आर्थिक विकास झपाटय़ाने होणार आहे, असे तज्ञांचे मत आहे.
पंतप्रधान मोदींच्या भाषणात उल्लेख
स्वदेशनिर्मित तंत्रज्ञानाचा उल्लेखही पंतप्रधान मोदींनी या परिषदेच्या उद्घाटनपर भाषणात केला. भारताच्या भौगोलिक माहिती तंत्रज्ञान विकासामुळे तरुणांना त्यांच्या संकल्पना साकारण्याचे स्वातंत्र्य मिळाले आहे. त्यांच्या वैज्ञानिक कल्पनाशक्तीसाठी आकाश मोकळे झाले आहे. गेल्या 200 वर्षांमध्ये साठविलेली माहिती आता त्यांच्यापर्यंत क्षणार्धात येऊ शकते. त्यामुळे नव्या तंत्रज्ञानाचा विकास करताना ते त्यांच्या संशोधनाची दिशा सहजगत्या निश्चित करु शकतात. भारताने ड्रोन तंत्रज्ञान विकासावर मोठा भर दिला आहे. तसेच हे तंत्रज्ञान सर्वांसाठी उपलब्धही करुन देण्यात आले आहे. त्यामुळे नव्या संशोधनाचा वेग वाढणार असून भारताला त्याचा लाभ होईल असा विश्वास पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला.