स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करताना कर्नाटकातील शिमोगा शहरात अप्रिय घटनेचे गालबोट लागले आहे. स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे फ्लेक्स हटवून दोघा हिंदू कार्यकर्त्यांवर चाकूहल्ला करण्यात आला आहे. या घटनेनंतर शिमोगा, भद्रावतीत तणाव आहे. मंगळूरची दंगल आटोक्मयात येते तोच शिमोग्याच्या शांततेला सुरुंग लावण्यात आला आहे. निवडणुका जशा जवळ येत आहेत, तसे जातीय सलोख्याला धक्का पोहोचविण्याचे प्रयत्न वाढले आहेत. भाजपचे अनेक मातब्बर नेते शिमोग्याचे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा, माजी मंत्री के. एस. ईश्वराप्पा, स्वतः गृहमंत्री अरग ज्ञानेंद्र हेही शिमोग्याचे. त्यामुळे पोलीस दलाने या घटना गांभीर्याने घेतल्या आहेत. अतिरिक्त राज्य पोलीस महासंचालक अलोककुमार स्वतः शिमोग्यात तळ ठोकून आहेत. चाकूहल्ला प्रकरणातील एका संशयितावर पोलिसांनी गोळीबार केला आहे.
एकीकडे मंगळूर जिल्हय़ातील प्रवीण नेट्टारू या भाजप कार्यकर्त्याच्या हत्या प्रकरणाची चौकशी एनआयएकडे सोपविण्यात आली आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी प्रवीण यांची हत्या करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले आहे. 26 जुलैच्या रात्री झालेल्या हत्या प्रकरणी आता एनआयएने एफआयआर दाखल केला आहे. 19 जुलै रोजी कळंज येथे झालेल्या मसूद या युवकाच्या हत्या प्रकरणाचा बदला घेण्यासाठी व स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण करण्यासाठी प्रवीणची हत्या झाल्याचे तपासात उघडकीस आले आहे. शिमोगा, मंगळूर आदींसह अनेक जिल्हे संवेदनशील बनत चालले आहेत. प्रेमसिंग नामक युवकावर चाकूहल्ला केल्याच्या आरोपावरून अटक करण्यात आलेल्या मोहम्मद जबीउल्ला याच्या पायावर पोलिसांनी गोळय़ा झाडल्या आहेत. आता चाकूहल्ल्याबरोबरच गोळीबार प्रकरणावरही ठळक चर्चा होऊ लागली आहे.शिमोगा पोलिसांच्या मते मंगळवारी पहाटे त्याला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरही जबीउल्लाने चाकूहल्ल्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्याच्यावर आत्मरक्षणासाठी गोळय़ा झाडल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. जबीउल्लाच्या पत्नीने पोलिसांची पोल खोलली आहे. रात्रीच्या जेवणानंतर नमाजला गेलेल्या जबीउल्लाला 9 वाजताच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. जो रात्री नऊपासून पोलिसांच्या ताब्यात आहे, तो पहाटे त्यांच्यावर चाकूहल्ला कसा करू शकतो, असा सवाल उपस्थित केला आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेली गोळीबार प्रकरणे कशी संशयास्पद आहेत, याचा जणू तिने उलगडाच केला आहे. शिमोगा पाठोपाठ तुमकूरमध्येही स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा फ्लेक्स फाडल्याची घटना घडली आहे. शिमोगा असो किंवा तुमकूर असो, दंगली भडकविण्याचा प्रयत्न करणाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशारा गृहमंत्र्यांनी दिला आहे.प्रवीण नेट्टारू या प्रमुख कार्यकर्त्याच्या हत्येनंतर भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱयांनी राजीनाम्याचे सत्र सुरू केले. आपल्याच पक्षाच्या सरकारवर कार्यकर्ते उघडपणे टीका करू लागले. भाजपच्या राजवटीत हिंदू सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे शिमोगा येथील घटनेनंतर सरकार आणि पर्यायाने पोलीस दल ऍक्शन मोडमध्ये आले आहे. पीएफआय आणि एसडीपीआय आदी संघटनांवर बंदी घालण्याची मागणी होऊ लागली आहे. शिमोगा घटनेनंतर पुन्हा जातीय सलोख्याला सुरुंग लागलेला असताना माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी मुस्लीमबहुल वसाहतीत सावरकरांचा फोटो कशाला लावला? असा प्रश्न उपस्थित केला आहे. त्यामुळे सिद्धरामय्या यांच्यावरही सोशल मीडियावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. जातीय सलोखा अबाधित राहील, असे वातावरण निर्मिती करण्याऐवजी दिवसेंदिवस ते कसे हाताबाहेर जाईल, अशीच कृती राजकीय नेते करू लागले आहेत, असा आरोप केला जात आहे. भाजपने शिमोगा घटनेवरून काँग्रेसला धारेवर धरले आहे.
काँग्रेसने आपली व्यूहरचना बदलली आहे. मंगळूरची घटना असो, शिमोग्याची असो, यापुढे मौन पाळलेलेच बरे, असा सध्या तरी काँग्रेस नेत्यांचा पवित्रा असायला हवा, असा सल्ला निवडणूक तज्ञांनी दिला आहे. हवे तर भ्रष्टाचाराच्या मुद्दय़ावर भाजपला धारेवर धरा. 40 टक्के कमिशनचा मुद्दा उपस्थित करा, मात्र जातीय सलोख्याचा विषय आला तर ठोस भूमिका घेण्याऐवजी मौन पाळलेलेच बरे असा सल्ला देण्यात आला आहे. तरीही सिद्धरामय्या यांनी मुस्लीमबहुल वसाहतीत सावरकरांचा फोटो का लावलात? असा प्रश्न उपस्थित करून काँग्रेसलाच अडचणीत आणले आहे.
कायदा व संसदीय व्यवहारमंत्री जे. सी. माधुस्वामी यांचा एक ऑडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या ऑडिओत आम्ही सरकार चालवत नाही, मॅनेज करतो आहोत, असे त्यांचे संभाषण आहे. सिद्धरामय्या यांच्या वक्तव्यामुळे जशी त्यांच्यावर टीका होते आहे, तशीच माधुस्वामी यांच्या ऑडिओमुळे ते अडचणीत सापडले आहे. माधुस्वामी यांनी ऑडिओतील आवाज आपलाच आहे. ते आपणच बोललो असल्याचे जाहीरपणे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांनी जर इच्छा व्यक्त केली तर राजीनामा देण्याची तयारीही त्यांनी दर्शविली आहे. माधुस्वामी यांच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नाही, असे सांगत मुख्यमंत्र्यांनी त्यांची पाठराखण केली असली तरी सरकारची वाटचाल कशा पद्धतीने सुरू आहे. सरकार चालले आहे की मॅनेज करून चालविले जात आहे, हे त्यांचे ऑडिओतील वक्तव्य बरेच काही सांगून जाते. पक्ष आणि सरकारवर सामान्य कार्यकर्ते नाराज असतानाच एकापाठोपाठ एक अडचणी उभ्या ठाकत आहेत. त्यामुळे 2023 मध्ये पुन्हा सत्तेवर यायचे असेल तर बी. एस. येडियुराप्पा यांच्याशिवाय गत्यंतर नाही, या निर्णयाप्रत हायकमांड पोहोचले आहे, हे दिसून येते. बुधवारी महत्त्वाच्या संसदीय समितीत येडियुराप्पा यांच्या नावाचा समावेश करण्यात आला आहे. या यादीत त्यांचे नाव पाचव्या स्थानावर आहे. ज्या येडियुराप्पा यांना वयाचे कारण पुढे करून मुख्यमंत्रिपदावरून बाजूला सारण्यात आले होते. आता त्यांनाच महत्त्व देण्यात आले आहे. बदलत्या राजकीय परिस्थितीमुळे पक्षात येडियुराप्पा यांचे स्थान पुन्हा मजबूत झाले आहे.