समाजमाध्यमांवर पोलिसांचे लक्ष
बेळगाव : आक्षेपार्ह स्टेट्सवरून कोल्हापुरात निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बेळगाव जिल्ह्यातही खबरदारी घेण्यात आली आहे. धार्मिक भावनांना धक्का पोहोचविणारे कोणतेही संदेश पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हा पोलीसप्रमुख डॉ. संजीव पाटील यांनी दिला आहे. यासंबंधी बुधवारी पोलीसप्रमुखांनी एक पत्रक प्रसिद्धीस दिले आहे. व्हॉट्सअॅप, फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्रामसह कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर धार्मिक भावनांना धक्का पोहोचविणारे संदेश पसरवू नयेत किंवा ते कोणीही पुढे पाठवू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. आक्षेपार्ह स्टेट्स किंवा संदेश पसरविणाऱ्यांविरुद्ध भादंवि 143 (ए), 295 (ए) व माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलीसप्रमुखांनी दिला आहे. कोल्हापूरच्या घटनेनंतर खासकरून निपाणीसह सीमाभागात पोलिसांनी खबरदारी घेतली आहे. समाजमाध्यमांवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. मोबाईलवर आक्षेपार्ह स्टेट्स ठेवल्यावरून कोल्हापुरात मंगळवार व बुधवार असे दोन दिवस तणाव निर्माण झाला होता. दगडफेकीच्या घटनाही घडल्या आहेत. पोलिसांनी लाठीहल्ला केला आहे. जिल्हा पोलीसप्रमुख बेंगळूर येथील बैठकीसाठी जाणार होते. कोल्हापुरातील घटनेच्या पार्श्वभूमीवर त्यांनी आपला बेंगळूर दौरा रद्द केला असून बेळगावातच तळ ठोकून आहेत.